NCP - Shivsena Leader
NCP - Shivsena Leader  Sarkarnama
विशेष

ED चे टार्गेट सेना-राष्ट्रवादीच! काॅंग्रेस नेत्यांचा म्हणूनच सुटकेचा निःश्वास....

ऋषीकेश नळगुणे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. आज सकाळी ५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ७ वाजता मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीसाठी जाताना मलिक हे स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे जमीनीबाबतचे थेट आणि कमी पैशात व्यवहार झाले होते. याच बाबतचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

मलिक यांच्या अटकेनंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कचाट्यात अडकलेले ते दहावे नेते ठरले आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री एकनाथ खडसे, मंत्री अनिल परब, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी, सीबीआय, आयकर अशा वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांनी वेळोवेळी वेगवेगळी कारवाई केली आहे.

याशिवाय आता ठाकरे कुटुंबियांवर देखील सोमय्या यांनी आरोप केले आहेत. मात्र या सगळ्यात आपल्याला कुठेही काँग्रेसचे नेते दिसून येत नाहीत. या कारवाईत ४ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ६ नेते, पदाधिकारी शिवसेनेचे दिसून येतात. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष जात्यात अडकले आहेत. काँग्रेस मात्र सुपात आहेत असेच म्हणावे लागेल.

फक्त २०२४ पर्यंत थांबा... संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया

नवाब मलिक किंवा आम्ही जे सातत्याने बोलत आहेत, असत्याचा पर्दाफाश करण्यात येत आहे, मुखवटे काढले जात आहेत, त्यांच्या मागे देशभरामध्ये ईडी, सीबीआय लावले जात आहेत. नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळी ईडीचे अधिकारी आले त्यांना घेवून गेले. त्यांची चौकशी होईल, आम्ही वाट बघत आहोत. ते नक्कीच संध्याकाळी घरी येतील आम्हाला खात्री आहे. पण महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला चौकशी यंत्रणा येतात आणि घेवून जातात, ठिक आहे पण ही चौकशी २०-२५ वर्षांनी चौकशी करत आहेत.

संजय राऊत पुढे म्हणाले, किरीट सोमय्यांनी ईडीकडे हे प्रकरण दिले आहे. पण आता भाजपा नेत्यांची आम्ही सगळी प्रकरणं ईडीकडे देणार आहोत. भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षासाठी ईडी आहे का? २०२४ नंतर मात्र हे चित्र वेगळे असेल. माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. मलिक सत्य बोलत आहेत, त्यांना चौकशीसाठी नेले आहे, हे महाराष्ट्र सरकारसमोर आव्हान आहे. तसेच २०२४ नंतर आम्ही सुध्दा तुमच्या मागे अशा तपास यंत्रणा लावू, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT