Eknath Shinde-Jayant Patil
Eknath Shinde-Jayant Patil Sarkarnama
विशेष

Eknath Shinde : ‘जयंतराव, आज समोर नाहीत, त्यामुळे मजा नाही...’ : मुख्यमंत्र्यांनी घेतली जयंत पाटलांची फिरकी

Vijaykumar Dudhale

पुणे : वसंतदादा शुगर इन्सिट्यूटच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची फिरकी घेतली. जयंतरावांच्याही तोंडात कायम साखर असते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजितदादांकडे (Ajit Pawar) जयंतरावांची आठवण काढली. तसेच, जयंतराव आज समोर नाहीत, त्यामुळे मजा नाही’ असे विधान करत मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटलांची फिरकी घेतली. (Chief Minister Eknath Shinde's comment on Jayant Patil)

वसंतदादा शुगर इन्सिट्यूटच्या वार्षिक पारितोषिकांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज मांजरी बुद्रूक (पुणे) येथे झाले. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी चिमटे घेत भाषण केले. त्याची सुरुवातच जयंत पाटील यांच्यापासून करण्यात आली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ज्यांच्या तोंडात कायम साखर असते, असे म्हणतात असे ज्येष्ठ नेते शरद पवार’ असा उल्लेख केला. त्यानंतर बोलताना ‘जयंतरावांच्याही तोंडी साखर असते, ते आमचे मित्र आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजितदादांकडे मी तुमची आठवण काढली. जयंतराव आज समोर नाहीत, त्यामुळे आज मजा नाही’ असेही म्हटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अधिवेशनाच्या काळात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले होते. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री शिंदे हेच आक्रमक झाले होते. त्यावरून शिंदे यांनी आज पुन्हा जयंतरावांच्या जखमेवरील खपली काढली.

मागच्या आठवड्यात मकर संक्रांत झाली, त्यामुळे सगळ्यांनीच गोड गोड बोलायचे. मीही मागच्या आठवड्यात दाओसला जाऊन आलो आहे. शरद पवार अनुभवी आहेत, त्यांना माहिती आहे. कुणीही काही म्हटलं तरीसुद्धा मोठी गुंतवणूक आपल्या राज्यासाठी या दाओस परिषदेत झाली आहे. राज्यातील सर्व भागात हे उद्योग जणार आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

पवार म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमीच सर्वांना मार्गदर्शन करत असतात. ते एक अनुभवी नेते आहेत. त्यांनी अनेक वर्षे राज्यात आणि देशात जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचे योगदानही फार मोठे आहे. त्यामुळे कुठला माणूस सत्तेवर बसला आहे, हे न पाहता राज्याच्या हितासाठी, भल्यासाठी आणि राज्यातील सर्वसामान्य माणसाला मदत होण्यासाठी ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. मलादेखील ते जेव्हा जेव्हा आवश्यकता आहे, तेव्हा तेव्हा फोन करतात. सूचनाही करतात आणि मार्गदर्शनही करतात, त्यांचा मी मनापासून आभारी आहे. सहकार क्षेत्रात त्यांचे जे योगदान आहे, ते कुणालाही नाकारता येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT