Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
विशेष

शिवसेनेकडून मोर्चेबांधणीस सुरुवात : महाआघाडी नेत्यांची वर्षावर बैठक; अपक्षांनाही निमंत्रण!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya sabha Election) बिनविरोधची परंपरा १८ वर्षानंतर मोडीत निघत अखेर राज्यात निवडणूक लागली आहे. दुपारच्या तीनपर्यंत कोणीही उमेदवारी मागे न घेतल्याने राज्यसभेची निवडणूक होत आहे. बिनविरोधचे प्रयत्न विफल झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (ता. ३ जून) सायंकाळी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक वर्षावर बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला या निवडणुकीत कमालीचे महत्व आलेल्या अपक्ष आमदारांनाही निमंत्रित करण्यात आलेले आहे, त्यामुळे शिवसेनेकडून मार्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. (CM convenes meeting of leaders of Mahavikas Aghadi; Invitation to Independents!)

राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात तब्बल १८ वर्षांनतर निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपकडून बिनविरोधसाठी एकमेकांना प्रस्ताव देण्यात आले. मात्र, तो प्रस्ताव कोणीही स्वीकारला नाही. तसेच, दुपारी तीनपर्यंत भाजप आणि शिवसेनेकडून कोणीही आपला उमेदवार मागे न घेतल्याने ही निवडणूक अखेर लागली आहे. आता खऱ्या अर्थाने राजकीय डावपेच आणि प्रतिडाव रंगणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला अपक्ष आमदारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना किती महत्व आले आहे, हे दर्शविणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. कारण, पक्षाच्या आमदारांना पोलिंग एजंटाला मतदान केल्याचे दाखवावे लागणार आहे, त्यामुळे पक्षीय पातळीवर मते फुटण्याची शक्यता कमी आहे. मात्र, अपक्ष आपल्या मर्जीचे मालक असणार आहेत.

वर्षा निवासस्थानी होणाऱ्या बैठकीसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावली आहे. अपक्ष आमदारांनाही निमंत्रण दिलेले आहे. निवडणूक म्हटल्यावर राजकीय पक्षांच्या अशा बैठका होत असतात. ही बैठक राज्यसभा निवडणुकीसाठीची आहे, तसेच २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचीही तयारी आम्हाला आतापासूनच करावी लागणार आहे.

या निवडणुकीसाठी पहिल्या पसंतीच्या क्रमाची ४२ मते विजयासाठी आवश्यक आहेत. भाजपची अधिकृत १०६ मते आहेत. विजयी मतांच्या कोट्यानुसार भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. भाजपकडे जादा २२ मते शिल्लक राहतात. या मतांच्या आधारावर भाजपने धनंजय महाडिक यांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे. भाजपला राजेंद्र राऊत, प्रकाश आवाडे, रवी राणा याशिवाय रासपचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, गोंदियाचे विनोद अगरवाल, उरणचे महेश बालदी अशा सात आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यात आणखी तीन मतांची भर पडल्याचे दिसून येत आहे. भाजपकडे ३२ जादा मते आता तयार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार (बच्चू कडू यांचा पक्ष) ३, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ अशा आमदारांचा समावेश आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने सेनेचा एक आमदार कमी झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT