Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav Thackeray sarkarnama
विशेष

उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे समर्थकांनी असा दिला `चकवा`

ज्ञानेश सावंत

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीचा (MLC election 2022) निकाल लागण्याआधीच मुंबई सोडण्याचा 'कट' रचल्याचे आता उघड झाले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदारांनी याची सारी तयारी 'दी वेस्टीन' हाॅटेलमध्येच केली होती. (Eknath Shinde latest news)

या सगळ्या आमदारांनी सोमवारी (ता. 20 जून) मतदानाला येण्याआधीच आपल्या बॅगा बाहेर काढून, मतदानानंतर पाच-पाच आमदारांच्या गटाने विधानभवन सोडले. गंभीर म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनातून निघण्याआधीच दोन वाजून पाच मिनिटांनी शिंदे समर्थक आमदार विधान भवन सोडले. त्याआधीच पाच मिनिटे म्हणजे, दुपारी दोन वाजता शिंदे हे निघून गेले होते.

मतदानासाठी शिंदे आल्यानंतर नाराज आहात का, या पत्रकारांच्या या प्रश्नावर 'नाराजीवर नंतर बोलतो', असे मोजके उत्तर देऊन शिंदे आपल्या गाडीत बसले. त्यानंतर शिंदे आणि काही आमदार ठाण्यातून सुरतकडे वळले. फोडाफोडी टाळण्याच्या उद्देशाने विधान परिषद निवडणुकीआधी शिवसेनेने आपल्या आमदारांना पवईतील दी वेस्टीनमध्ये ठेवले. होते. मात्र, त्याआधी वर्षावर आलेल्या आमदारांना शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेटले नसल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्यात भर पडत गेली, ती आमदारांवर अविश्वास दाखविला जात असल्याची. त्यातून शिंदे समर्थक आमदारांनी तक्रारीचा पाढा वाचायला सुरूवात केली. त्याच हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदारांच्या गुप्त बैठकाही झाल्या आणि निकालानंतर नेतृत्वाला 'धडा' शिकविण्याचा पवित्रा घेतला.

ही बाब शिंदेंच्याही कानावर घातली गेली; तोपर्यंत स्वपक्षातील उलटसुलट चर्चानी शिंदेही हैराण झाले होते. या घडोमोडीनंतर विधान भवनात सोमवारी मतदानासाठी आलेले आमदारांनी मुंबईबाहेर जाऊन 'नॉट रिचेबल' किंवा फोन न घेण्याची भूमिका घेतली होती.

त्यानुसार दुपारी दोनच्या आत काही आमदारांनी मतदान केल्यानंतर विधनभवनात जेवण केले. त्यानंतर आपल्या 'पीए' आणि ड्रायव्हरना बॅगा ठाण्यात आणण्यास सांगितले. तेव्हा काही आमदारांनी रेनकोट, छत्री आणि ट्रॅक सूटही मागविला होता. त्यामुळे ही मंडळी चार-आठ दिवसांसाठीच गायब होणार असल्याचे संकेत मिळाले होते. राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही ठाकरे सरकारमध्ये फाटाफूट झाली आणि हातात जेमतेम दोन-चार मते असतानाही भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आला. या निवडणुकीत थेट शिवसेना, त्यांना पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार आणि काँग्रेसचीही मते फोडण्यात भाजपला यश आले.

त्याआधीच ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादाला सुरवात झाली होती. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसून आघाडीचा सहापैकी एक उमेदवार पडणार असल्याचेही सांगण्यात येत आहेत. नेमके तसेच घडले आणि शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेनेच्या तंबुतील काही अपक्ष भाजपच्या गळाला लागले. त्यानंतर मात्र, थेट ठाकरे सरकार पडण्याच्या चर्चाना वेग आला. तेवढ्याच विधान परिषदेच्या निकालाची वाट न पाहताच शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी नेतृत्वाला चकवा देत सुरत गाठले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT