Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

हायकमांडने आदेश देताच सत्तास्थापनेचा दावा करू : फडणवीसांचे वक्तव्य!

सरकारनामा ब्यूरो

पणजी : गोव्यात भाजप बहुमताजवळ पोचला असून तीन अपक्षांनी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे कमळ पुन्हा फुलणार हे नक्की आहे. गोव्यातील दमदार कामगिरीनंतर निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विजयाबद्दल गोव्याच्या जनतेचे आभार मानत हायकमांड आदेश देताच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. (As soon as High Command gives order, we will claim establishment of power in Goa : Devendra Fadnavis)

गोव्यात भाजपने २० जागांवर आघाडी कायम राखली असून बहुमतासाठी गोव्यात २१ जागांची आवश्यकता आहे. या ठिकाणी काँग्रेस ११, मगो २, आप २, गोवा फॉरवर्ड एक, तर तीन अपक्ष आघाडीवर आहेत. त्यामुळे गोव्यात भाजपचे पुन्हा सरकार येणार हे निश्चित आहे. आता मुख्यमंत्री कोण बनणार, याकडे मात्र जनतेचे लक्ष लागले आहे.

गोव्यातील विजयी कामगिरीनंतर देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाने गोव्यात जो विजय मिळविला आहे, त्याबद्दल गोव्याचे जनतेचे आभार मानतो. आम्हाला बहुमत मिळत असले तरी अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष यांना सोबत घेऊन आम्ही राज्यात चांगले आणि स्थिर सरकार देणार आहोत.

गोव्यात सरकार स्थापनेचा दावा कधी करणार, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याबाबतचा निर्णय भाजपची केंद्रीय समिती घेते. भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड त्यासंदर्भातील निर्णय घेतात. ते जेव्हा आम्हाला सांगितील की, निर्णय झाला तेव्हा आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत.

दरम्यान, सुमारे ५०० मतांनी विजयी झालेले प्रमोद सावंत यांनी विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या विजयाचे श्रेय हे माझे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाला जाते. मी मतदारसंघात नसतानाही त्यांनी माझ्यासाठी काम केले आहे. गोव्याच्या जनतेने विकासासाठी भाजपला पुन्हा कौल दिला आहे. अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष यांना सोबत घेऊन आम्ही गोव्यात सरकार स्थापन करणार आहोत.

राणेंची कमाल

काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले विश्वजित राणे यांनी पुन्हा एकदा आपली कमाल दाखवून दिली आहे. विश्वजित हे स्वतः वाळपई मतदारसंघातून ७ हजार मतांच्या फरकांनी जिंकले आहेत. त्यांची पत्नी दिव्या राणे ह्या पर्ये मतदारसंघातून जवळपास १४००० मतांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे विश्वजित राणे यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी निवडणुकीच्या दरम्यान चर्चेत आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT