Bhaskar Jadhav-Narayan Rane
Bhaskar Jadhav-Narayan Rane Sarkarnama
विशेष

Bhaskar Jadhav Vs Rane : नारायण राणेंची ती ऑफर मी ठामपणे नाकारली आणि... : भास्कर जाधवांनी सांगितली ती गोष्ट

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मी नारायण राणेंसोबत (Narayan Rane) काँग्रेस पक्षात यावं, असा त्यांचा आग्रह होता. मात्र, मी ते हसण्यावर नेत असे. पण एकेदिवशी त्यांनी मला बोलावून सांगितलं की, मी येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. तुम्ही आत्ताच पक्षात आला तर ठीक नाही तर पुन्हा आला तर मला तुमच्यासाठी काहीच करता येणार नाही. त्यावेळी मी त्यांची ऑफर स्पष्ट शब्दांत नाकारली. त्यानंतरही आमचे संबंध चांगले होते. गैरसमजुतीतून त्यांच्या मुलाने माझे कार्यालय फोडले, त्यानंतर आम्ही त्यांची सहा कार्यालये फोडली, त्यानंतर राणे-जाधव यांच्यात राजकीय वादाला सुरुवात झाली, असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितले. (I firmly rejected Narayan Rane's offer: Bhaskar Jadhav)

कोकणातील नेत्यांच्या भाषेबद्दल जाधव बोलत होते. ते म्हणाले की, आमच्या भाषा योग्य नाहीत, हे मान्यच आहे. पण ही भाषा ठराविकच लोकांबाबत आहेत. आज आमच्या मुलांबाबत कोणाच्या तक्रारी आहेत का. पण, नारायण राणे यांची मुलं कोणाला सोडतात. मी सोडा; पण कुणाबद्दल, कोणाला, कोणत्या भाषेत बोलावं, याचं काहीही ताळतंत्र आणि विधिनिषेध त्यांच्या मुलांना नाही. कोणीही असलं तरी त्यांचं उचलली जीभ लावली टाळ्याला, असं असतं.

जाधव म्हणाले की, नारायणराव राणे आणि माझ्यात कोणतंही वैर नाही. राणेंनी शिवसेना सोडण्याच्या अगोदर मी शिवसेना सोडली आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलो. त्यानंतर राणे हे काँग्रेस पक्षात गेले. मी त्यांच्याबरोबर यावं, असा त्यांचा आग्रह होता. पण मी ते हसण्यावर घालवत असे. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार, अशा रोजच बातम्या यायच्या. मला त्यांनी एकदा बोलावून घेतलं आणि सांगितलं की, मी येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. तुम्ही आताच माझ्या पक्षात आला तर ठीक आहे नाही; तर मुख्यमंत्री झाल्यानंतर आला तर लोक म्हणतील भास्कर जाधव स्वार्थासाठी आले आहेत. (त्यांनी स्वार्थ हा शब्द वापरला नाही. मात्र, त्यांचं ट्युनिंग तसं होतं.) त्यावेळी मला तुमच्यासाठी काहीच करता येणार नाही.

त्यावेळी मी नारायण राणेंना स्पष्टपणे सांगितलं की, साहेब आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या वेळी विचारलं तेव्हा मी हसण्यावरी नेलं. पण आज मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मोठे व्हा. तुम्ही मुख्यमंत्री झाला तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही. मी तुमच्याकडे काहीही मागायला येणार नाही. त्याचं कारण असं आहे की, माझं वय अजून माझ्या हातात आहे. मी आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलो आहे. तो पक्ष सोडून येणं मला कदापि शक्य होणार नाही.

त्या घटनेनंतरही त्यांचे आणि माझे संबंध चांगलेच होते. कुठेही बिघडलेले नव्हते. एक दिवस मी चुकचो बोललो असे समजून त्यांच्या मुलाने येऊन माझं कार्यालय फोडलं. तुम्ही जर सत्ता, पैसा, मस्तीच्या जोरावर आमचं कार्यालय फोडत असाल तर भास्कर जाधव यांच्याकडे नक्कीच स्वाभिमान आहे. त्यांनी माझं एक कार्यालय फोडलं पण मी त्यांची सहा कार्यालयं फोडून टाकली. मी म्हणजे मी स्वतः नव्हे. तेथपासून जो शाब्दीक सामना रंगला आहे, तो आजतागायत सुरू आहे, असेही भास्कर जाधव यांनी नमूद केले.

भास्कर जाधव आणि सुनील तटकरेंचे संबंध...

खासदार सुनील तटकरे आणि मी एकमेकांवर भरपूर राजकीय हल्ले केले आहेत. त्यांनी शाब्दीक हल्ले केले नाहीत; पण अज्ञात राजकीय वार माझ्यावर भरपूर केले आहेत. माझ्या मुलाच्या लग्नातील वाद आजही मला भोगावा लागतोय, सहन करावा लागत आहे. शाब्दीक वार मीच जास्त केले आहेत, हे खरं आहे. माझ्याविरोधात कठोर जाहीर वक्तव्य करणं टाळलं आहे. पण, आम्ही दोघांनीही मर्यादा पाळल्या आहेत. मतभेद असतील पण संबंध तोडायचे नाहीत, त्यामुळे आम्ही दोघांनी तो विचार पाळला आहे. दोन पावलं मागं जाण्याचा निर्णय तटकरे आणि मी घेतला आहे. दोघेही आम्ही एकमेकांना ओळखून आहोत, एकमेकांचा मानसन्मान राखून आहेात, अशा शब्दांत तटकरे यांच्यासोबतच्या राजकीय वादावर भास्कर जाधव यांनी भाष्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT