Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
विशेष

मला एक्साईज खातं दिलं; पण आजपर्यंत मी दारूच्या थेंबालाही हात लावलेला नाही!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पूर्वी दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याकडे उत्पादन शुल्क (एक्साईज) मंत्रालय होते. फेरबदलात त्यांनी गृहमंत्रालय घेतले आणि मला दिले उत्पादन शुल्क विभाग. माझ्याकडे एक्साईज विभाग आला आहे. मात्र, मी जन्माला आल्यापासून दारूच्या एका थेंबालाही हात लावलेला नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी (ता. २५ मार्च) विधानसभेत बोलताना केले. (I have never touched a drop of alcohol till today: Ajit Pawar)

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, वाईनविक्री धोरणाचा मुद्दा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतला होता. चंद्रशेखर बावनकुळे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री असताना त्यांनी घरपोच दारु मिळणार असल्याचा प्रस्ताव आणला होता. राज्यभरातून टीका झाल्यावर तो बारगळला. पण, राज्याचे उत्पन्नाबाबत विचार करावा लागतो. मध्य प्रदेशमध्ये याबाबतचा विचार करून निर्णय घेतला आहे. ज्यांचे एक कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न आहे, त्यांना बार उघडण्याचा परवाना त्या सरकारने दिला आहे.

आपल्याकडे दारूवर ३०० टक्के टॅक्स होता, तो आपण १५० टक्क्यांवर आणला आहे. दिल्लीत कर कमी होता. जे दारुचे दर्दी आहेत, ते दिल्लीला गेले की दोन्ही हातात दारु घेऊन यायचे. टॅक्स कमी केल्यानंतर १०० कोटींवरून ३०० कोटीपर्यंत उत्पन्न गेले आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री अजून लागू केलेली नाही. त्याची सरसकट सर्वांना सक्तीही नाही. सुपर मार्केटच्या मालकाची परवानगी असेल तरच संबंधित सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवली जाणार आहे. त्याबाबतच्या हरकती आपण मागविल्या आहेत, असेही अजितदादांनी सांगितले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसले, तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे हजारे यांना भेटायला गेले हेाते. तसेच अधिकारीही त्यांना जाऊन भेटले आहेत. याबाबत कोरोना काळात आमच्यावर टीका झाली. पण विरोधक हे करतच असतात. आम्हीही विरोधात असताना तेच केले आहे. वाईन पिऊन गाडी चालवली, तर कारवाई होणारच आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

सुपर मार्केटमध्ये मटन चिकन आणि मासे असतात. माळकरी तिकडे वास आला की जातही नाही. तसंच वाईनचं असणार आहे. एखाद्या पेताडाला कुढून ही मिळते. तो एखाद्या नवीन गावात गेला तर त्याला बरोबर ते दुकान सापडतं. त्या गावातील लोकांना माहीत नसत. पण तो बरोबर शोधून काढतो. तुम्हीही त्या भागातील आहेत, तुम्हालाही त्याचा अनुभव असेल असे सभापती नरहरी झिरवाळ यांच्याकडे बघून अजित पवार म्हणाले. हरकती, सूचनांचा विचार करूनच वाई विक्रीचा निर्णय घेतला जाईल.

लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून चंद्रपुरातील दारुबंदी उठवली

चंद्रपूर भागातील दारू उठवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. त्यानंतर विचार करून रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्या समितीने दारुबंदी आणि दारु सुरू असतानाचा गुन्ह्यांचा तुलनात्मक अभ्यास करून दारूबंदी उठवण्याचा निर्णय झाला. पोलिसांकडून दारूबंदी झाल्यानंतर गुन्ह्यात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. शाळेतील मुलं शेजारच्या राज्यातून दारू आणून चंद्रपुरात विकायला आणू लागले होते, असेही अजितदादांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांना नाव न घेता टोला

चक्राकार पद्धत आता नोकरीत नाही, त्यामुळे विदर्भात अधिकरी जात नाहीत. ते नोकरीच्या शेवटच्या टप्यात पुणे आणि मुंबईत येतात. त्या अधिकाऱ्यांनाही मुंबई आणि पुणेच हवे असते. तस काही राजकीय नेत्यांचंही झाले आहे, असा टोला अजित पवारांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्याच्या संदर्भात तुम्ही मला सह्याचं पत्र दिल. मात्र, त्यात देवेंद्र फडणवीस यांची सही नाही. अनेक आमदारांनी दोनदा सही करुन आकडा मोठा फुगवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT