Shivajirao Konde Join congress
Shivajirao Konde Join congress Sarkarnama
विशेष

काँग्रेस सोडणे, ही चूकच होती : राष्ट्रवादीला रामराम केलेल्या ज्येष्ठ नेत्याची कबुली

किरण भदे

नसरापूर (जि. पुणे) : ‘‘सर्वांत कमी वयात माजी मंत्री अनंतराव थोपटे साहेबांनी मला राजगड साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद दिले होते, त्यामुळे काँग्रेस सोडणे ही माझी चूक होती. यापुढे कोणत्याही अपेक्षेशिवाय काँग्रेसमध्ये (congress) कार्यरत राहणार आहे,’’ अशी कबुली काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शिवाजीराव कोंडे यांनी दिली. (Leaving Congress was a mistake : Shivajirao Konde's confession)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कोंडे यांनी आज (ता. २८ एप्रिल) आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या कार्यक्रमात कोंडे बोलत होते. ते म्हणाले की, केळवडे गावचे पाच ते सहा वर्षे मी सरपंच होतो. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी १९९५ मध्ये मला वयाच्या ३४ व्या वर्षी राजगड सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध काम करण्याची संधी दिली. त्याच वेळी तरुण, होतकरू मुलगा म्हणून माझ्याकडे राजगड कारखान्याचे उपाध्यक्षपद सोपवले होते. अत्यंत कमी वयात त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला होता. त्यावेळचा अनुभव, वय पाहता माझ्याकडून काही राजकीय चुका झाल्या, त्यामुळे आम्ही इतर पक्षात गेलो.

माजी मंत्री थोपटे यांची शिकवणूक ही स्वाभिमानाची होती. आमचा फुकटचा स्वाभिमान होता, त्यामुळे आजपर्यंत थोपटे यांच्यापासून दूर राहिलो. अनेक मंडळी काँग्रेस पक्षात परत आली. नंतरच्या काळात थोपटेसाहेब कळाले. मात्र वळत नव्हते. त्यामुळे काँग्रेसमध्ये परतण्याची मनाची तयारी मागच झाली होती. पण, स्वाभिमान म्हणायचा परत कशाला जायचे. त्यामुळे काँग्रेसमध्ये परतणे लांबवणीवर पडत गेले. पण, आज ती वेळ आली आणि आम्ही संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे कोंडे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, गेल्या चार ते पाच वर्षांपासून मी प्रचंड अस्वस्थ होतो. अपेक्षा वाढल्यामुळे लोक सोडून जाऊन लागले होते. पद नसल्यामुळे कार्यकर्ते चुकीच्या मार्गाने जाऊ लागले हेाते, त्यामुळे अस्वस्थता होती. या पुढील काळातही राजग कारखान्यावर काम करण्याची संधी मिळाली, तर या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. नाही मिळाली तरी काही हरकत नाही. आमदार थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षासाठी ते सांगतील काम करण्याची आमची तयारी आहे.

आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, देवाने कुठंतरी आपली गाठ बांधलेली होती. मात्र ती गोठ शोधायला २२ वर्षे लागली, ही खंत आहे. मागील काही काळात संवादाचा अभाव होता. पण ती समस्या आता दूर झाली आहे. यापुढे तुम्हाला काँग्रेस पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल. साखर कारखानदारी विशेषतः आपल्या राजगड कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे राजगड कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. त्यासंदर्भात आम्ही संबंधितांशी बोललो होतो, पण त्यात यश न आल्याने कारखान्याची निवडणूक लागली आहे. ज्यांना कारखान्यावर संधी देता आली नाही, त्यांना इतर संस्थांवर संधी देण्यात येईल, असा मी शब्द देतो, असेही आमदार संग्राम थोपटे यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT