Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
विशेष

महाराष्ट्र दिल्लीत कोणालाही टक्कर देईल : अजित पवारांचे सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

जुन्नर : गरज पडली महाराष्ट्र (Maharashtra) दिल्लीत (Delhi) कोणालाही टक्कर देईल, हा आपला इतिहास आहे. महाराष्ट्र कुणापुढेही झुकलेला नाही आणि यापुढेही झुकणारही नाही, असे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुन्नरमध्ये केले. (Maharashtra will hit anyone in Delhi : Ajit Pawar)

जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील मल्टीस्पेशालटी रुग्णालयाचे उद्‌घाटन आणि जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणाचे कार्य आपल्याला पुढे न्यायाचे आहे. महाराजांनी मावळ्यांना ताकद कशी दिली. गोरगरिबांना त्यांनी एकत्र कसे आणले, हेही आपण पाहिले पाहिजे. इतर राज्ये वेगवेगळ्या नावाने आजही ओळखली जातात. पण, महाराष्ट्र हे रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते. शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून जातीपातीचे राजकारण न करता काम करण्यात येत आहे.

अजित पवार म्हणाले की, जाती-पातीचे राजकारण होऊ नये, असे आमचे म्हणणे आहे. पण, आज काही जणांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे जावे लागणार आहे. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीकडून काम करण्यात येत आहे. कोरोना काळात जिवाभावाची अनेक लोकं आपल्याला सोडून गेली आहे. ते दुःख आपण अजूनही विसरलेलो नाही. त्यानंतर आता कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, त्यामुळे कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावेत.

महाविकास आघाडीच्या काळात जुन्नर तालुक्यात ४९४ कोटी रुपयांच्या विकासाची कामांची उद्‌घाटने करण्यात आली आहेत. तरुण वयासाठी जिवाचे रान करुन काम करायचे. विकासाचे वैभव उभं करण्यासाठी काम करतो आहेत. त्या विकासकामात राजकारण कधीच आणले नाही. जुन्नर पर्यटन तालुका म्हणून घोषीत झाला आहे. यामध्ये विकासाचे वैभव पुढील काळात उभं करण्यात येईल. शिवनेरीबरोबर लेण्याद्री, ओझरला पुढील काळातही निधी देणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आज निवडणुका झाल्या, तर ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळणार नाही, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट येतं, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र मदतीला धावून गेला आहे. तो यापुढेही जाईल, असे सांगून ‘राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी झाल्याशिवाय साखर कारखाने बंद केले जाणार नाहीत,’ अशी घोषणा अजित पवार यांनी जुन्नरमध्ये बोलताना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT