Manohar Joshi Sarkarnama
विशेष

Solapur Mill Worker : मनोहर जोशींच्या ‘त्या’ निर्णयामुळे सोलापूरच्या गिरणी कामगारांची दिवाळी झाली गोड...!

Vijaykumar Dudhale

Solapur News : सोलापूर शहरातील लक्ष्मी, विष्णू या गिरण्यांना घरघर लागली होती. लक्ष्मी विष्णू ही मिल १९९५ मध्ये बंद पडली. मिल बंद पडल्यामुळे कामगारांना पगार मिळत नव्हता. दिवाळी तोंडावर आलेली...हाताला काम नसल्यामुळे पगारच मिळत नव्हता. बोनसची गोष्ट तर दूरच. पण, गिरणी कामगाराचे आमदार पुत्र उत्तमप्रकाश खंदारे यांनी कामगारांना सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री जोशी यांनी प्रतिकामगाराला ५००० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले, त्यामुळे सुमारे साडेतीन हजार गिरणी कामगारांची दिवाळी गोड झाली. (welfare grant)

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या आठवणींना १९९५ मध्ये आमदार झालेले उत्तमप्रकाश खंदारे यांनी उजाळा दिला. त्यावेळी मुख्यमंत्री जोशी यांनी गिरणी कामगारांना कशा प्रकारे दिलासा दिला होता, हे खंदारे यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, सोलापूर शहरातील लक्ष्मी, विष्णू मिलला घरघर लागली होती. ही गिरणी १९९५ मध्ये बंद पडली. गिरणी बंद पडल्यामुळे कामगारांना पगारच मिळत नव्हता. बोनसची गोष्ट तर दूरची. (Solapur mill worker News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिवाळी तोंडावर आलेली होती. गिरणी बंद पडल्यामुळे पगार नसल्यामुळे कामगार हवालदिल झाले होते. काय करायचे असा त्यांच्यापुढे प्रश्न होता. मीही गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे मी ती परिस्थिती जवळून पाहत होतो. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कानावर ही गोष्ट घातली. पण, खासगी गिरणीतील कामगारांना राज्य सरकारकडून बोनस (सानुग्रह अनुदान) देणे नियमांत बसत नव्हते. पण, मार्ग काढण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू होता, असे खंदारे यांनी नमूद केले.

दिवाळी काही दिवसांवर आली होती. मी जोशी सरांचा पिच्छा सोडत नव्हतो, त्यामुळे अखेर मुख्यमंत्री जोशी कामगारांना सानुग्रह अनुदान द्यायला तयार झाले. त्यासाठी मनोहर जोशी यांनी नियम बाजूला ठेवून सोलापुरातील गिरणी कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचा फायदा सुमारे साडेतीन हजार कामगारांना झाला आणि त्यांची त्या वर्षीची दिवाळी गोड झाली.

गिरणी कामगारांच्या पगारातून मालकांनी जीपीएफचा हिस्सा कापून घेतला होता. मात्र, तो भविष्य निर्वाह निधीकडे जमा केलेला नव्हता, त्यासाठी पाठपुरावा केला होता. सरकारने तो हिस्सा प्रतिकामगार ५००० रुपये भरण्याचा निर्णय घेतला. तसेच, लक्ष्मी आणि विष्णू मिल सुरू व्हाव्यात, यासाठी गिरणी मालकासोबत मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, कामगारमंत्री साबीरभाई शेख आणि माझ्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या. पण, गिरणी मालक मान्य करायला तयार नव्हते. त्यावेळी कामगारमंत्री साबीरभाईंचा आक्रमक पवित्रा लक्षात राहण्यासारखा होता.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT