Deepak Kesarkar-Sharad Pawar-Sanjay Raut
Deepak Kesarkar-Sharad Pawar-Sanjay Raut Sarkarnama
विशेष

'राऊतांच्या सल्ल्याने अख्खी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधायची का?'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आमचे हे बंड नाही, तर ही शिवसेनेच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. आमचा लढा सत्तेसाठी नाही, सत्तेत आम्ही होताच. पण, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सल्ल्याने अख्खा पक्ष जर शरद पवारांच्या (sharad Pawar) दावणीला बांधायचा असेल, तर मग शिवसेनेचे अस्तित्त्व काय उरेल? सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि शरद पवारांना खुश करण्याच्या नादात आम्ही आमचा आत्मसन्मान घालवायचा का? , असे टोकदार सवाल बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहेत. (MLA Deepak Kesarkar criticizes Sanjay Raut)

आमदार केसरकर यांनी गुवाहाटीमधून आपला बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे, शिवसेनेचे शिवसैनिक काही काळासाठी बाहेर काय पडलो, तर घाण ठरलो, डुकरं ठरलो. आमच्याच भरवशावर राज्यसभेत बसणारे रोज विखारी भाषा करतात. आता तर आमच्या मृतदेहांची त्यांना आस लागली आहे. कळीचा मुद्दा हाच आहे आणि गुवाहाटीत बसून आमचा, शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचे तेच खरे कारण आहे. तीच या सन्मानाच्या लढाईची पार्श्वभूमी आहे. हे बंड नाही, तर ही शिवसेनेच्या आत्मसन्मानाची लढाई आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

आज आम्हाला विकले गेलेले ठरविणारे कोण, केव्हा, कसे आणि कुणाला विकले गेले, हे थोडक्यात सांगण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत आम्ही एकत्रित लढलो. शिवसेनेची ताकद होतीच. पण, सोबतच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांच्या परिश्रमामुळे शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाले. विधानसभेची निवडणूकसुद्धा आम्ही एकत्रित लढविण्याचेच ठरविले होते. त्यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मिशन १५१+ ची घोषणा दिली होती. अशात भाजपाने १४० जागांचा प्रस्ताव दिला होता. पण, वाटाघाटीअंती भाजपने १२७ जागा घ्यायच्या आणि शिवसेनेला १४७ जागा द्यायच्या, यावर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेची ताकद होतीच. पण, चार जागांचा आग्रह काही सोडण्यात आला नाही. शेवटी जे व्हायला नको, तेच झाले. दीर्घकाळाची युती तुटली आणि आम्हाला वेगवेगळ्या निवडणुका लढाव्या लागल्या, अशा शब्दांत केसरकर यांनी युती तुटण्याला आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरले आहे.

केसरकर यांनी सांगितले की, सन २०१४ ची निवडणूक असो की, २०१९ नंतर राज्यात उदभवलेली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की भाजपाचे केंद्रीय अथवा अगदी राज्यस्तरावरील नेते अगदी कुणीही लढा सत्तेसाठी नाही, सत्तेत तर आम्ही होतोच. पण, संजय राऊतांच्या सल्ल्याने अख्खा पक्ष जर शरद पवारांच्या दावणीला बांधायचा असेल तर मग शिवसेनेचे अस्तित्त्व काय उरेल? ज्या काश्मीरच्या प्रश्नावर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली, नव्हे काश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात निमंत्रण दिले, त्या कलम ३७० च्यावेळी उघडपणे आमच्या नेत्यांना बोलता येऊ नये, इतकी वाईट अवस्था? सोनिया गांधी आणि शरद पवारांना खुश करण्याच्या नादात आम्ही आमचा आत्मसन्मान घालवायचा का?

सर्व महत्त्वाची खाती काँग्रेस, राष्ट्रवादीला देऊन टाकायची आणि मुख्यमंत्रीपद तेवढे ठेवायचे. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव करायचा तरी कसा? राज्यसभा निवडणुकीतही या पक्षांनी शिवसेनेच्याच उमेदवाराला हरवायचे. मग करायचे तरी काय? नुसतं सहन करीत बसायचे का? असा सवाल आमदार केसरकर यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT