Aditya Thackeray-Dilip Walse Patil
Aditya Thackeray-Dilip Walse Patil Sarkarnama
विशेष

मनसे ही टाईमपास टोळी : आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण हे टाईमपास राजकारण आहे. त्यामुळे अगोदर मी मनसेला टाईमपास टोळी म्हणायचो. सध्या मनसे भाजपची ‘सी टीम’ बनली आहे. कारण, एमआयएम ही भाजपची ‘बी टीम’ आहे. मनसे सी टीम बनल्याचा आपल्याला आनंद आहे, असा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मनसेला नाव न घेता लगावला. (MNS is a timepass gang : Aditya Thackeray)

सकाळ माध्यम समुहाच्या वतीने लिडिंग आयकॉन्स ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराचे वितरण रविवारी (ता. ३ एप्रिल) पुण्यात झाले. त्या कार्यक्रमात ‘साम टीव्ही’चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये भाजप आणि मनसे हे दोघे शिवसेनेच्या हिंदुत्ववादी राजकारणाची महाराष्ट्रातील जागा व्यापण्याचा प्रयत्न करत आहेत का?तसेच, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून घेतलेली भूमिका याबाबत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी मनसेवर हल्लाबोल केला.

जनतेला दिलेली वचने पूर्ण करणे आणि त्यांची सेवा करणे हेच आमचे हिंदुत्व आहे. भाजप मात्र आपल्या सत्तेसाठी इतर पक्षांना वापरून घेतो. प्रक्षोभक बोलून, हिंदू-मुस्लीम दंगे करून तसेच वाद घडवून भारतीय जनता पक्ष सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काल झालल्या गुढी पाडवा मेळाव्यातील भाषण हा त्यातीलच एक प्रकार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

जो पक्ष इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करू शकला नाही, त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे. पण राज्यातील जनतेनीही हे लक्ष ठेवावं की कोणाच्या तरी बोलण्यावरून वाद-विवाद वाढू नयेत. हिंदुत्वासाठी एकमेकांमध्ये सारखं लढत राहिलं नाही पाहिजे. शिवसेना अयोध्या गेली. आता तिथला विषय संपला, संघर्षही संपला. आता तिकडे कोणीही जाऊ शकतो, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्याच्या घोषणेवर लगावला.

मुंबईकरांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मेट्रोच्या दोन लाईन काल पूर्ण झाल्या. कोस्टल रोडसारखे मोठे प्रोजेक्ट करत आहे. गल्लीतील कामेही दर्जेदार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईकरांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे, असा आशावादही आदित्य यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

नाणारमधील रिफायनी प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्याच आठवड्यात मी त्या भागात गेलो होतो. दोन्ही बाजूंची निवेदने मी घेतली आहेत. त्यांना सरकार तुमचं आहे, असा विश्वास दिला. जे काही म्हणणं आहे, ऐकून घेतलं जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांना सांगितले आहे. नाणारची जागा मी पहिली आहे. जंगल आहे, तिथे रिफायनरी होणं योग्य नव्हतं. रिफायनरीसाठी समुद्राजवळची जागा लागते. पुन्हा आम्ही चर्चा केली आहे. स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध असेल तर आम्हीही तयार होणार नाही. प्रकल्पग्रस्त लोकांबरोबर चर्चा करणे गरजेचे आहे. आपण केंद्राकडे एक ते दोन प्रस्ताव दिले आहेत. जिथे झाडे कमी आहेत, लोकवस्ती कमी आहे. ज्यांना प्रकल्प हवा आणि नको त्यांना समोर बसवून आम्ही चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी तसं जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT