Raj Thackeray  Sarkarnama
विशेष

MNS 18th Vardhapan Divas : मनसेचा राजकारणातील करिश्मा आजही कायम !

Sachin Waghmare

Mns Chief Raj Thackeray : शिवसेना सोडल्यानंतर नवा पक्ष स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे हे पहिले शिवसैनिक आहेत. राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेशी संबंध तोडले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी शिवसेनेचा मूळचा मुद्दा अर्थात मराठी अस्मितेच्या मुद्द्यालाच हात घालत तो जिवंत केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 ला आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीन पक्षाची स्थापना केली.

18 वर्षांच्या राजकीय वाटचालीत मनसेनं अनेक चढउतार पाहिलेत. राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करून 18 वर्षे उलटून गेली आहेत. कुठल्याही राजकीय आणि सामाजिक विचारधारेसाठी पाळमुळं घट्ट करण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांच्या सभांना होणारी मोठी गर्दी पाहता राज ठाकरे यांचा राजकारणातील करिश्मा आजही कायम आहे. MNS 18th Vardhapan Divas

मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कुणाचीही तमा बाळगली नाही. रस्त्यावर उतरून दोन हात करण्याचा बाळासाहेबांचा करारी बाणा आणि त्यांचा करिश्मा आधी मुंबईकरांवर आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेवर जादू करून गेला. त्या माध्यमातून पहिल्यांदा मराठी माणसांसाठी बाळासाहेबांनी सत्तेची दारे उघडली. महाराष्ट्र धर्म नावाची संकल्पना त्यांनी मांडली. (MNS News)

प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा राज यांना आहे. तो वारसा त्यांनी जपला आहे. बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्या विचारसरणीवर वाटचाल करीत त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर आमदार त्यांच्यासोबत नसतील, पण त्यांच्या पाठोपाठ मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेना सोडली.

आलेल्या शिवसैनिकांना सोबत घेऊनच त्यांनी आपलं राजकारण केले. शिवसेना सोडल्यानंतर 2006 च्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. तिथून परतल्यानंतर राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 ला मुंबईतल्या यशवतंराव चव्हाण सेंटरमध्ये एक पत्रकार परिषद घेत नव्या पक्षाची घोषणा केली.

पक्षाचं नाव आणि झेंडा त्यांनी जाहीर केला, ज्यात भगव्याबरोबरच पांढरा, हिरवा आणि निळ्या रंगांचा समावेश होता. एक सेक्युलर संकल्पना त्यांनी त्यातून पुढे आणली होती. मराठी मुस्लिम आणि रिपब्लिकन चळवळीपासून दूर गेलेल्या, दलित तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राज यांनी केला होता. एक सोशल इंजिनिअरिंगचा केलेला प्रयत्न खूप जणांना भावला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले

राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिंमतीवर नवा पक्ष उभा करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांनी कडव्या मराठीपणाचा मुद्दा हाच 'मनसे'चा अजेंडा असेल, असे जाहीर केलं. त्यानंतर लगेचच एका वर्षात म्हणजे 2007 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले. 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले, तर महापालिकेत मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले होते. पुणे व नाशिक पालिकेत मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले होते.

राज यांच्या या नव्या पक्षाच्या रूपानं महाराष्ट्रात एका नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाला होता. मनसेला 2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण 13 आमदार निवडून आले. "मनसे'ला तेवढ्याच म्हणजे आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. एकोणतीस जागांवर "मनसे'चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते.

2012 च्या महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दमदार कामगिरी केली. मुंबई 28, ठाणे महानगरपालिकेत 7, पुणे महानगरपालिकेत 29, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 4, नाशिक महानगरपालिकेत 40 नगरसेवक निवडून आले होते.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ही सोशल इंजिनिअरिंगची संकल्पना त्या काळानंतर फारशी वापरली नाही. राज यांची भाषण शैली, त्यांनी मांडलेले मुद्दे, महाराष्ट्र धर्माची संकल्पना याकडे राज्यातली तरुण मंडळी आकर्षित झाली. शिवाय, शिवसेनेतल्या असंतुष्टांनासुद्धा राज ठाकरेंच्या पक्षाच्या रूपानं नवा पर्याय मिळाला होता. त्यामुळे त्याकाळी त्यांच्याकडे येणाऱ्यांचा ओढा वाढला होता.

मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन

मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करत रस्त्यावर उतर अनेक तरुणांनी स्वतःवर केसेस घालून घेतल्या. अनेक ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करत मनसे सैनिकांनी लक्ष वेधून घेतलं होते. विशेषतः टोलप्रश्नी केलेले आंदोलन आजही सर्वांच्या लक्षात राहते. टोल दरवाढ मागे न घेतल्यास आम्ही टोल नाके जाळून टाकू, असा इशारा त्यांनी दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे टोलच्या मुद्द्यावरून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली. त्याचा फायदा मनसेला झाला.

मनसेने आक्रमक होत केली आंदोलने

त्यासोबतच दुकानं आणि अस्थापनांवरली मराठी पाट्यांसाठी मुंबई, ठाण्यानंतर आता पुण्यात मनसेने (MNS) आक्रमक होत आंदोलन केले. मराठी पाट्याच्या संबंधी घेतलेली भूमिका आजही त्यांनी कायम ठेवली आहे. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात व समाजकारणात तीव्र संघर्षाद्वारे परप्रांतीयांचे वर्चस्व संपूर्णतः नेस्तनाबूत करणे आणि `मराठी माणसासाठीच महाराष्ट्र' यानुसार आग्रही अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विचारधारा राहिली आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच हा पक्ष सदैव प्रयत्नशील आहे.

R

SCROLL FOR NEXT