Eknath Shinde-Devendra Fadnavis-Narendra Patil
Eknath Shinde-Devendra Fadnavis-Narendra Patil Sarkarnama
विशेष

नरेंद्र पाटलांना मिळणार मोठी जबाबदारी : माथाडींच्या मेळाव्यात फडणवीसांचे सूतोवाच

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई : मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विनंती केली आहे की, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची जबाबदारी पुन्हा एकदा नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनाच दिली पाहिजे. आता मी जरी विनंती केली असली तरी तुमचे (नरेंद्र पाटील) आणि त्यांचे (एकनाथ शिंदे) प्रेमाचे संबंध आहेत आणि तुम्ही दोघंही सातारा (Satara) जिल्ह्याचे आहात, त्यामुळे तुम्ही विदर्भातील माणसाला काय विचारणार? तुम्ही दोघं मिळून सर्व ठरवून टाकणार. पण, मला विश्वास आहे की, मुख्यमंत्री शिंदे हे याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असे सांगून या महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटील यांच्याकडेच येणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. (Narendra Patil will get a big responsibility : Devendra Fadnavis)

अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथे माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी नरेंद्र पाटील यांच्या कामाचे कौतुक करत नव्या जबाबदारीबाबत सूतोवाच केले.

ते म्हणाले की, नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी सातत्याने काम केले आहे. तसेच, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला जवळपास १५ वर्षे आर्थिक तरतूद करण्यात आली नव्हती. पण, आमच्या सरकारच्या काळात या महामंडळाचे पुनरुज्जीवन केले आणि नरेंद्र पाटील यांना या महामंडळाचे प्रमुख बनविले. अण्णासाहेबांचा हा पठ्ठ्या प्रत्येक जिल्ह्यांतील तालुक्याच्या ठिकाणी गेला. मराठा समाजातील तरुणांना उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मीही प्रत्येक जिल्ह्यांत गेल्यानंतर बॅंकेच्या लोकांना अर्थपुरवठ्याबाबत सूचना द्यायचो, त्यामुळे आज जवळपास ५० हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली आहे.

केवळ तीन ते साडेतीन वर्षे नरेंद्र पाटील हे मेहनत करून ५० हजार तरुणांना उद्योजक बनवू शकतात, तर त्यापूर्वीच्या १५ ते २० वर्षांत हे काम सातत्याने सुरू राहिले असतं, तर दोन ते अडीच लाख मराठा तरुण नोकरीसाठी भटकण्याऐवजी उद्योजक झाले असते. त्यांनी लाखो तरुणांना काम दिलं असतं. नरेंद्र पाटील यांनी अत्यंत चांगलं काम केले आहे, अशा शब्दांत पाटील यांच्या कामाचे फडणवीस यांनी कौतुक केले.

फडणवीस म्हणाले की, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठीच हे नवं सरकार आणलेले आहे. आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत. आमच्या हातात पेन सकारात्मक लिहिण्यासाठी येतो. मुख्यमंत्री आणि मी दररोज लोकांना भेटतो, त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. माथाडी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविणे कठीण होते. मात्र, नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही तो मागील सरकारच्या काळात सोडविण्यात आला. उर्वरीत प्रश्नही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहाय्याने सोडविण्यात येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT