Mumbai News : लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या रणधुमाळीत अजित पवार गटाकडून सातारा लोकसभेची जागा सोडत असतानाच राज्यसभेच्या जास्त दिवस मुदत असलेल्या खासदारकीवर दावा करण्यात आला होता. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार आता भाजपने त्यांना राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत चार वर्षे खासदारकीची मुदत शिल्लक असलेली जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी सोडली आहे.
राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत चार वर्षे खासदारकीची मुदत शिल्लक असलेली जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या (NCP)अजित पवार गटासाठी सोडण्यात आली आहे. तर पावणे दोन वर्ष मुदत शिल्लक असलेली जागा भाजपचे (Bjp) धैर्यशील पाटील यांना मिळणार आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढले असून लोकसभेत एक तर राज्यसभेत तीन खासदार झाल्याने एकूण चार खासदार झाले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने खासदार प्रफुल्ल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदी नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती तर उदयनराजे भोसले यांनी सातारा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवल्याने राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. यापैकी गोयल यांची राज्यसभेची मुदत ही जुलै 2028 पर्यंत आहे तर भोसले यांची मुदत एप्रिल 2026 पर्यंत शिल्लक आहे.
त्यामुळेच अजित पवार गटाने पीयूष गोयल यांची रिक्त होणारी जागा आम्हाला मिळावी, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांन लोकसभेच्या जागावाटपावेळी आश्वासन देण्यात आले होते, असे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले होते.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना पीयूष गोयल यांच्या लोकसभेवर निवडीने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नितीन पाटील यांनी दाखल केला. त्यामुळे पाटील यांना जुलै 2028 पर्यंत राज्यसभेची खासदारकी मिळणार आहे. उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपचे धैर्यशील पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांच्या बिनविरोध निवडीची आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने चार जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये रायगडमधून सुनील तटकरे हे विजयी झाले होते. तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे आधीपासूनच खासदार होते. सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या आता चार होणार आहे. यामुळेच प्रफुल्ल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद द्यावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसने आता भूमिका घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी दोनच खासदार असल्याने राष्ट्रवादीला केवळ राज्यमंत्रीपद (स्वतंत्र कार्यभार) मोदी सरकारमध्ये देऊ करण्यात आले होते. पण पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्रिपद भूषविले असल्याने त्यांनी राज्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. आता ती चूक दुरुस्त करावी, असा आग्रह राष्ट्रवादीकडून धरला जात आहे. त्यामुळे येत्या काळात त्यावर आता भाजपकडून काय निर्णय घेतला जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.