Ashok Pawar | Baburao Pacharne
Ashok Pawar | Baburao Pacharne Sarkarnama
विशेष

खरा, जुना मित्र गमावला; राजकारणात आम्ही जिव्हाळा अन् विरोध दोन्ही अनुभवले : अशोक पवार

नितीन बारवकर

पुणे : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाबुराव पाचर्णे (Baburao Pacharne) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज (गुरुवार) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर राज्यातील सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. यावेळी राजकारणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जिवाभावाचे साथीदार तर नंतरच्या काळात कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेल्या माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या निधनाबद्दल शिरुरचे आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले.

राजकारणात वाटा वेगळ्या होऊनही आम्ही परस्परांवर कधी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही व आपापसांत कधी कटूता निर्माण होऊ दिली नाही, असे सांगताना पवार यांनी एक जुना सच्चा आणि जीवाभावाचा सखा गमावला असल्याची प्रतिक्रिया सरकारनामाशी बोलताना व्यक्त केली.

पाचर्णे आजारी असतानाही आमदार पवार यांनी वेळोवेळी रूग्णालयात व त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली होती. पाचर्णे यांना दिलासा देताना त्यांच्या कुटूंबियांनाही धीर दिला होता. पाचर्णेंना गलितगात्र झालेले पाहून पवारांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते. १९९५ च्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने पाचर्णे यांनी ही पहिलीच विधानसभा निवडणूक अपक्ष लढविली. तेव्हा पाचर्णे यांच्या प्रचाराची सारी सुत्रे अशोक पवार यांच्या हाती होती. राजकारणातील प्रस्थापितांना टक्कर देत तरूणांचे नवे नेते म्हणूनच पाचर्णे-पवार यांच्या जोडीकडे त्यावेळी पाहिले जायचे. कालांतराने दोघांच्याही राजकीय वाटा वेगळ्या झाल्या.

पाचर्णे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ॲड. पवार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. पाचर्णेंसोबतच्या अनेक आठवणी सांगताना त्यांना हुंदका अनावर झाला. ते म्हणाले, मी एक खरा, जुना मित्र आज गमावला. राजकारणात आम्ही जिव्हाळा आणि विरोध दोन्ही अनुभवले. राजकीय वाटा वेगळ्या झाल्यावरही खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका न करण्याचा कटाक्ष आम्ही दोघांनीही पाळला. राजकारणात काही वेळा पुढे - मागे होऊनही आम्ही आमचे कौटुंबिक स्नेहसंबंध कायम जपले.

पहिल्या विधानसभा निवडणूकीत त्यांना अपक्ष उभे करण्यात आम्ही तरूणांनीच पुढाकार घेतला होता. एक कार्यक्षम, धडपड्या, मनमिळाऊ, निरपेक्ष व निरलस मनाच्या या मित्राला विजय मिळवून देण्यात आम्हाला काहीसे अपयश आले. मात्र, तेथून पुढेच बाबूरावजींचे नेतृत्व खऱ्या अर्थाने फळले, फुलले. या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी मोठी होती. ती दखल घेऊनच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना भाजपची उमेदवारी दिली व ते पहिल्यांदा आमदार होऊ शकले. त्यांनी त्यांच्या काळात केलेली कामेच त्यांच्या कार्यक्षमतेची आठवण देत राहतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT