Telangana Political News : 'महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवणार, पक्षनोंदणीचा 02 कोटींचा टप्पा लवकरच पार करणार,' अशा घोषणा करणाऱ्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचा गुलाबी रंग कधी फिका पडला काही कळलंच नाही.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांच्यासह BRS पक्ष सपाटून आपटला आणि आमदार, खासदारांनी पक्षातून काढता पाय घेतला. BRS चा राजा काय पडला, पक्षांतराचा खेळ सुरू झाला...
भाजपनं पक्ष फोडल्याची घसाफोड करणाऱ्यांकडं आमच्या पक्षाचे आमदार फोडण्याचे नैतिक अधिष्ठान आहे का?, असा प्रश्न BRS नं केला आहे.
“सध्या आमदार फोडण्याचा भाव 50 कोटी असल्याचं विधान करणाऱ्या सिद्धरामैया Siddaramaiah यांनी तेलंगणामधील सध्याचा भाव किती आहे,'' असा सवालही त्यांनी केला. भारत राष्ट्र समितीनं पक्षांतराविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात यापूर्वीच धाव घेतली आहे. आता आम्ही राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्यक्षांना भेटून या प्रकारच्या पक्षांतरावर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी विनंती करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं.
विधानसभेला सत्ता गेली, लोकसभेला भोपळा!
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत BRS पक्षाची तेलंगणा राज्यात अत्यंत सुमार कामगिरी दिसून आली. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणात सत्तापालट काय झाला BRS पक्षात सुरू झालेल्या भरतीला ओहोटी लागली.
119 पैकी अवघ्या 39 जागा BRS च्या पदरात पडल्या. पक्षप्रमुख के. सी. राव यांचा लाजिरवाणा पराभव तर झालाच, पण गेल्या 10 वर्षांची एक हाती सत्ता गेल्यानं BRS च्या राजाच्या डोक्यावरील सत्तामुकुटही गळून पडला.
त्यानंतर लोकसभा निवडणूक Lok Sabha लागली, पण 2019 च्या लोकसभेला 09 जागा जिंकलेल्या या पक्षाला 2024 च्या निवडणुकीत तेलंगणातील 17 जागांपैकी एकही जागा जिंकता आली नाही. परिणामी, राज्यातील सत्ता गमावून बसलेली या पक्षातील नेतेमंडळी आता दुसऱ्या पक्षांत विशेषत: काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.
बंदला कृष्ण मोहन रेड्डी (गडवाल), पोचाराम श्रीनिवास रेड्डी (बंसवाडा), दानम नागेंद्र (खैरताबाद), कडियाम श्रीहरी (स्टेशन घानपूर), काले यदाय्या (चेवेल्ला), तेलम वेंकट राव (भद्रचलम) आणि संजय कुमार (जगतियाल) या 07 आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं सध्या विधानसभेतील BRS चं संख्याबळ 39 वरून 32 वर आलं आहे.
शिवाय दंडे विट्टल, टी. भानुप्रसाद राव, बोग्गारापू दयानंद, एम. एस. प्रभाकर राव, येगे मल्लेशम आणि बसवराजू सरैया हे विधानपरिषदेचे 06 आमदारदेखील काँग्रेसवासी झाले आहेत. राज्यसभा खासदार के. केशव राव यांनीही पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पक्षांतर बंदी कायद्याविरोधात जाऊन काँग्रेस आमच्या नेत्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करून घेत असल्याचा आरोप केटीआर यांनी केला आहे. BRS नं पक्षांतराविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात यापूर्वीच धाव घेतली असून आता राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्यक्षांना भेटून या प्रकारच्या पक्षांतरावर पूर्णपणे बंदी आणण्यासाठीची विनंतीही पक्षाकडून केली जाणार आहे. पक्षांतरावर पूर्णपणे बंदी आणली जावी, अशी पक्षाची मागणी आहे.
एकूणच काय तर BRS च्या राजाची गच्छंती होताच पक्षाचे आमदार, खासदार पाय लावून पळू लागले आहेत. तेलंगणात BRS च्या एका खासदारसह 13 आमदार फोडत काँग्रेसनं भाजपच्या पायावर पाय ठेवत 'ऑपरेशन लोटस' प्रमाणं 'ऑपरेशन हँड' राबवलं असंच म्हणावं लागेल.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.