Rahul Gandhi  sarkarnama
विशेष

Congress Politics : ‘जय भीम-जय संविधान’सह काँग्रेसचे संघटनात्मक बदल

Constitution Jai Bhim Rahul Gandhi maharashtra Congress : काँग्रेससोबत आलेला अनुसूचित जाती समाज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सोबत राहिला का? याचे उत्तर शोधल्यास काँग्रेसला फारसे समाधानकारक उत्तर मिळणार नाही.

प्रमोद बोडके

प्रमोद बोडके

Congress Politics : अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने राज्यभर डॉ. आंबेडकर सन्मान मोर्चा काढला. बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेसच्या शताब्दी सोहळ्यातून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘जय बापू, जय भीम आणि जय संविधान’चा नारा दिला. सरत्या वर्षात नव्या वर्षाची दिशाच काँग्रेसने स्पष्ट केली आहे. नव्या वर्षात काँग्रेस संघटनात्मक बदलासाठीही २०२५ मध्ये काम करणार असल्याचे स्पष्ट संकेतही खर्गे यांनी दिले आहेत. काँग्रेसच्या नव्या मोहिमेचा महाराष्ट्रातील नवा शिलेदार कोण? याचे उत्तर नव्या वर्षात मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत विशेषतः काँग्रेससोबत आलेला अनुसूचित जाती समाज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सोबत राहिला का? याचे उत्तर शोधल्यास काँग्रेसला फारसे समाधानकारक उत्तर मिळणार नाही. महाराष्ट्रातील पराभवावर इलाज आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेसने नव्या वर्षातील भाजप विरोधातील लढाईची रूपरेषा निश्‍चित केल्याचे दिसते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे जाहीर केलेला दुखवटा नव्या वर्षाच्या सुरुवातीला संपत आहे.

बेळगावच्या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलेल्या सूचनेच्या अंमलबजावणीसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठकांचे सत्र सुरू होऊ शकते, तसे संकेतच मिळू लागले आहेत.

काँग्रेस नक्की कशी आहे? भल्याभल्यांना लवकर समजत नाही. जनतेमधील चर्चा, अपेक्षा काँग्रेसच्या वरिष्ठांपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याने निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची पडझड झाली. सत्ता आणि संघटनेचा तत्काळ संगम घडवत भाजपने रणनीती आखली आणि विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले. महाराष्ट्रात भाजप सत्तेत आल्यानंतर प्रदेशाध्यक्षांवर महसूल मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. संघटना टिकली तरच सत्ता आपोआप टिकते याचे गमक भाजपला फार पूर्वीच समजल्याने त्यांनी संघटनेची जबाबदारी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर सोपविली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये ना लोकसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर बदल दिसला ना विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर तत्काळ बदल दिसला. कोणत्या मुद्यांवर जनतेत जाऊन काम करायचे? आता ही जबाबदारी कोणी पेलायची? याचाही फैसला लवकर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वादळापूर्वीची शांतता?

परभणी आणि बीडच्या घटनांमुळे महाराष्ट्र खदखदत असताना सध्या राज्याच्या काँग्रेसमध्ये दिसत असलेली शांतता ही मोठ्या वादळापूर्वीची तर शांतता नाही ना? अशी शंका येऊ लागली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा गेल्या आठवड्यात परभणीमध्ये झाला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे २० ते २५ मिनिटे संवाद साधला. दुसरीकडे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात व आमदार अमित देशमुख यांनी मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथे जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. परभणी आणि बीडच्या घटनेतील पिडितांना, कुटुंबियांना काँग्रेसने धीर देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले.

आमदार धस चमकले

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रश्‍न विधानसभेत, मिडियामध्ये आणि जनतेत उचलून धरण्यात भाजप आमदार सुरेश धस सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. मंत्री धनंजय मुंडे, मुंडे यांचे कार्यकर्ते आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आमदार धस यांचे भाष्य प्रभावी ठरू लागले आहे. राज्यातील महायुतीचे विरोधक म्हणून जी जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार-खासदारांनी पार पाडायला हवी होती. ती जबाबदारी भाजपचे आमदार धस पार पाडत आहेत. आमदार धस यांची धाडसी आक्रमकता आणि समयसूचकतेमुळे राज्यातील आणि बीड जिल्ह्यातील विरोधकाची जागाही भाजपच्या आमदारांनी घेतल्याचे वारंवार दिसत आहे. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे व आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आवाज उठवत आहेत. धस यांच्यापुढे खासदार सोनवणे व आमदार क्षीरसागर यांचा आवाज कमी पडत असल्याचे दिसते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT