पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा जगासमोर आल्या आहेत. गेल्या कित्येक दशकांपासून पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या देशात फक्त दहशतवादाचंच पीक घेतलं आणि त्याचे परिणाम फक्त भारतालाच नव्हे तर जगातील अनेक देशांना भोगावे लागत आहेत. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानने रशियापासून इंग्लंडपर्यंत सर्वच देशांची डोकेदुखी वाढवली आहे, याचे पुरावे आता पुन्हा समोर येऊ लागले आहेत.
गेली काही वर्षे तुलनेनं शांत असलेल्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा रक्तरंजित हिंसाचार केल्याने देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकारनेही या घटनेनंतर आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. समोरासमोर युद्ध करण्याची ताकद नसल्यानं दहशतवादाचा मार्ग अवलंबणाऱ्या पाकिस्तानच्या कुरापती आता उघड्या पडू लागल्या आहेत. काश्मीरपासून काबुलपर्यंत आणि मॉस्कोपासून लंडनपर्यंत झालेल्या दहशतवादी हिंसाचारात पाकिस्तानचा हात असल्याचे भारताने पुराव्यांसहित समोर आणले आहे.
2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अवघ्या जगात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यांत पाकिस्तान सरकारचीही भूमिका असू शकते, असे संकेत खुद्द पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 2018 मध्ये दिले होते. इतकेच नव्हे तर त्या देशाचे माजी हुकूमशाह आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनीही दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचं मान्य केलं होतं. 'भारताला चर्चेसाठी तयार करण्याचा एक मार्ग म्हणून दहशतवादाचा वापर झाला. पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले अन् सरकारने जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केले', असे मुशर्रफ यांनी कबुल केले होते.
अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी दहशतवादी आणि गुप्तचर यंत्रणा सक्रिय आहेत, हे उघड गुपित आहे. आजवर अफगाणिस्तानचे नागरिक, सरकारी आस्थापनांवर झालेल्या हल्ल्यांत पाकिस्तानचा सहभाग असल्याचंही समोर आलं आहे. २००८ मध्ये काबुलमधील भारतील दुतावासावर हल्ला झाला होता. त्यानंतर 2011 मध्ये तेथील अमेरिकी दुतावासावरही हल्ला झाला होता. यात पाकिस्तानच्या आयएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात होता, असा दावा ज्येष्ठ पत्रकार कार्लोटा गॉल यांनी केला होता.
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये 2024 मध्ये एका कॉन्सर्ट हॉलमध्ये हिंसाचार झाला होता. यातही पाकिस्तानचा संबंध असल्याचे पुरावे समोर आले आहेत. सुरुवातीच्या तपासानुसार या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांना प्रशिक्षण किंवा रसद पाकिस्तानमधून पुरवण्यात आली होती.
याशिवाय गेल्या काही वर्षांत इराण व पाकिस्तानचा संघर्ष टोकाला गेला आहे. पाकिस्तानमधील जैश-उल-अदल या दहशतवादी संघटनेनं इराणी सैन्यावर अनेकदा हल्ले केले आहेत. शिवाय 2005 मध्ये लंडनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचे सूत्रधारही पाकिस्तानमध्येच प्रशिक्षण घेऊन आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.