Raju Shetti-Arvind Kejriwal
Raju Shetti-Arvind Kejriwal  Sarkarnama
विशेष

राजू शेट्टी जाणार अरविंद केजरीवालांच्या मार्गाने!

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कोल्हापुरात मंगळवारी (ता. ५ एप्रिल) केली. ही घोषणा करताना त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे राजू शेट्टी हे भाजपबरोबर जाण्याची शक्यता मावळली आहे. तसेच, पंजाबमधील ‘आप’च्या यशानंतर शेट्टी यांनी बोलून दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. (Raju Shetti will go the way of Arvind Kejriwal : Decision not to go with any party anymore)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विनंतीवरून आम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील झालो होतो. पण, या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांची फसवूणक केली आहे. ज्या विश्वासाने आम्ही महाविकास आघाडीत गेलो होतो, तो विश्वास त्यांनी तोडला आहे, त्यामुळे यापुढे आम्ही आमच्या विचाराने जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचे आणि आमचे संबंध यापुढे संपले आहेत, असे राजू शेट्टी यांनी ही घोषणा करताना म्हटले होते.

शेट्टी म्हणाले की, केंद्र आणि सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. सर्वच पक्षांकडून आम्हाला सारखीच वागणूक मिळाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात राज्यातील महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार अपयशी ठरले आहेत. एकवेळ आम्ही भाजपला मदत केलीय आणि आता महाविकास आघाडीला मदत केली आहे. आता हे दोघेही शेतकऱ्यांची फसवणूक करणार असतील, तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडेल म्हणूनच आम्ही वेळोवेळी आमच्या भूमिका बदलल्या, असेही त्यांनी टीकाकरांना उत्तर दिले. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये ठरल्याप्रमाणे येत्या १ मे रोजी गावसभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठराव करून घ्यायचा आहे. गावातील शेतकऱ्यांच्या मागणीवर संसदेत ठराव करायला आम्ही भाग पाडू. शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार म्हणून शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, यासाठीही गाव सभेत ठराव घ्या. त्यासाठी गावागावांत जाऊन हुंकार यात्रा काढली जाणार आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

आपच्या विजयानंतर काय म्हणाले होते शेट्टी?

सध्या महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकमेकांचे कपडे उतरवायच्या कामाला लागले आहेत. या पक्षाच्या वादाला राज्यातील जनता आता कंटाळली आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या उमेदवारांवर आर्थिक बोझा टाकणार नसेल तर महाराष्ट्राला आम्ही पंजाबप्रमाणे निश्चित पर्याय देऊ, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगून ‘आप’प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढविण्याबाबत सूतोवाच केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT