Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama
विशेष

Sadabahu Khot News : 'त्या' निवडणुकीतून माघार घेतल्याने मिळाली सदाभाऊंना आमदारकीची बक्षिसी !

Sachin Waghmare

Mumbai News : महायुतीचा गेल्या दहा वर्षांपासून घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांचे नाव चर्चेत नसताना अचानक भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली. या मुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असला तरी त्यांना उमेदवारी देण्याचे कारण वेगळे आहे.

जून 2022 च्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्यासह भाजपने सहा जणांना उमेदवारी दिली होती. मात्र, ते सहावा उमेदवार असल्याने व विजयासाठीचा कोटा जुळत नसल्याने त्यांना अचानक निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे यावेळेस दिलेली उमेदवारी ही त्या निवडणुकीत घेतलेल्या माघारीचे बक्षीस आहे. (Sadabahu Khot News)

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढली होती. त्यावेळेस त्यांनी आघाडीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांना कडवी झुंज दिली होती. केवळ 25 हजार मताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या या कामगिरीची दाखल घेत भाजपकडून 2016 ते 2022 या काळात त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते काहीकाळ राज्यमंत्री ही होते. त्यानंतर जून 2022 मध्ये त्यांच्या विधानपरिषदेची मुदत संपली. त्यावेळी साधारण दोन वर्षापूर्वी भाजपने (Bjp) त्यांना पुन्हा विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्यासह सहा जणांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत हे सहावा उमेदवार होते. खोत सहावा उमेदवार असल्याने त्यांना अचानक निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास सांगण्यात आले होते.

त्या निवडणुकीच्या आधी पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का दिला होता. यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सावध भूमिका घेतली जात होती.

दरम्यान, भाजपकडूनही नवी रणनिती त्यावेळी आखली गेली. त्याचा एक भाग म्हणून त्यावेळेस सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घ्यावी लागली. भाजपला विधानपरिषदेसाठी मतांची गोळा बेरीज केल्यानंतर सहावी जागा निवडून येणे कठीण होते. त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेण्यास सांगितली होती.

जून 2022 मधील विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ नसतानाही पाच उमेदवार निवडून आणले. त्या निवडणुकीनंतर 20 जून 2022 च्या रात्रीच शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहटीला गेले अन् आठ दिवसातच राज्यात सत्तांतर झाले.

त्या वेळेस सदाभाऊ खोत यांनी निवडणुकीतून घेतलेल्या माघारीचा आज त्यांना दोन वर्षानंतर फायदा झाला असून भाजपकडून त्यांना पुन्हा विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यावेळेस दिलेली आमदारकी ही त्या निवडणुकीत घेतलेल्या माघारीचे बक्षीस असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT