Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar Sarkarnama
विशेष

शिवसेनेचे पाच आमदार पाडणाऱ्या काँग्रेसला जागा सोडावी लागल्याचे दुःख मोठे

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : ज्या काँग्रेस पक्षाने (congress) शिवसेनेचे (shivsena) पाच आमदार पाडले, त्यांना कोल्हापूर उत्तर मतदारसंघ सोडावा लागत आहे, याचे मला मनस्वी दुःख होत आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत व्हायला हवी होती, त्यानंतर काँग्रेसला शहरातील शिवसेनेची ताकद कळाली असती, अशा शब्दांत शिवसेनेचे माजी आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. (Sadness that Congress had to give Kolhapur North constituency : Rajesh Kshirsagar)

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडल्याने क्षीरसागर हे गेली दाेन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली होती. गेली दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले क्षीरसागर आज सायंकाळी कोल्हापुरात परतले. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थासमोर मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली. त्यानंतर क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मी जर निवडून आलाे असतो तर मी पालकमंत्री होणार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानांवर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करणार, या भीतीपोटी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपने माझा खोट्या पद्धतीने पराभव केला. मागील निवडणुकीत माझा जरी पराभव झाला असला तरीही पक्षप्रमुखांनी मला नियोजन आयोगाचे कार्याध्यक्षपद दिले. हे मी त्यांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले.

ते माझे दुर्दैव

शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षाने ही पोटनिवडणूक लढवण्याचे ठरविले होते. महाविकास आघाडी करत असताना तीनही पक्षांनी एकत्र राहण्याचे ठरले होती. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीने कोल्हापूर जिल्हा बॅंकच्या निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी केली. त्याचे उत्तर त्यांनी शिवसेनेला देण्याची गरज आहे. त्याचवेळी संपर्क प्रमुख आणि संपर्क नेत्यांनी कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घेण्यासाठी पक्षप्रमुखांना पटवून द्यायला हवे होते. पण तसे घडले नाही, हे माझे दुर्दैव आहे, अशी खंतही राजेश क्षीरसागर यांनी यावेळी बोलून दाखवली.

शिवसैनिकांना न्याय कधी मिळणार

गोकुळमध्ये गरज होती, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी आघाडी केली. शिवसेनेमुळेच गोकुळमध्ये सत्ता आली. पण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत त्यांना आमच्याशी आघाडी नको आहे. त्यामुळे शिवसैनिकांना न्याय कधी मिळणार, असा माझा सवाल आहे. काँग्रेसला ही जागा सोडली असली तरी २०२४ मध्ये ही जागा शिवसेना लढणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीसाठी जिल्ह्यात जोमाने कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना या वेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT