Samadhan Avtade
Samadhan Avtade Sarkarnama
विशेष

‘आम्ही दुष्काळात जन्मलो असलो, तरी दुष्काळात आम्हाला मरू देऊ नका'

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मी आमदार झाल्यापासून प्रत्येक अधिवेशना सर्व आयुधांचा वापर करून मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील २४ गावांचा पाणीप्रश्न उपस्थित केला. पण, माझ्या आणि माझ्या तालुक्यातील लोकांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. आमच्या अनेक पिढ्या दुष्काळात गेल्या आहेत. आज आम्ही दुष्काळात जन्मलो असलो, तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका, अशी भावनिक साद आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी आज विधानसभेत घातली. (MLA Samadhan Avtade raised the issue of Mangalveda Upsa Irrigation Scheme in Assembly)

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासंदर्भातील प्रश्न समाधान आवताडे यांनी आमदार झाल्यापासून प्रत्येक अधिवेशनात उपस्थित केला होता. तत्पूर्वी (स्व.) आमदार भारत भालके यांनीही पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्या प्रश्नाला आता यश आले असून देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांची, तर त्यानंतरच्या सात दिवसांत मंत्रिमंडळाची मंजुरी देण्याचे मान्य केले आहे.

या प्रश्नावर बोलताना समाधान आतवाडे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांच्या पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. ही चर्चा आपल्यापुढे मांडत असताना मला अत्यंत वाईट वाटत आहे. कारण मी आमदार झाल्यापासून माझे हे चौथे अधिवेशन आहे. या अधिवेशनात मी जे काही प्रश्न आणि समस्या मांडल्या. त्यात २४ गावांसदर्भातीलही प्रश्न विचारले होते. त्याबाबत सरकारशी पत्रव्यवहार केले होते. शक्य त्या सर्व आयुधांचा वापर केला. पण, माझ्या आणि २४ गावांतील लोकांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. प्रशासनाला विचारले तर ‘अंतिम मान्यतेसाठी योजनेची फाईल मंत्र्यांकडे आहे, मुख्यमंत्र्यांकडे आहे,’ असे उत्तर दिले जायचे.

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिणेचा भाग हा दुष्काळी आहे. आमच्या अनेक पिढ्या दुष्काळात गेल्या आहेत. आज आम्ही दुष्काळात जन्मलो असलो, तरी दुष्काळात मरु देऊ नका. आमच्या अनेक पिढ्या नुसत्या आश्वासनावर गेल्या आहेत. पण, मला आता आशा आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे हे या योजनेतील सर्व अडथळे तातडीने दूर करतील आणि २४ गावांतील लोकांना न्याय देतील, असा अपेक्षाही आमदार आवताडे यांनी बोलताना व्यक्त केली.

त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी आवताडे यांना आश्वस्त करतो की अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांच्या आत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांची मान्यता देण्यात येईल. त्यानंतरच्या सात दिवसांच्या आत कॅबिनेटची मान्यता देण्यात येईल. या योजनेसाठी वेगळी तरतूद करायची असेल ती करण्यात येईल. नाहीतर आहे त्या तरतूदींमधून या कामाला मान्यता देण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT