Saroj Patil-Sharad Pawar
Saroj Patil-Sharad Pawar Sarkarnama
विशेष

Saroj Patil On Sharad Pawar Retirement: अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पवारांना त्यांच्या बहिणीने दिला हा सल्ला…

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचं म्हणणं असं आहे की, पर्यायी माणूस तयार व्हायला पाहिजे. ते म्हणतात, ते सर्व बरोबर आहे. पण, शरद पवारांनी त्यांच्यासारखंच पर्यायी नेतृत्व तयार करावं; मगच खुर्ची सोडावी, असा सल्ला पवारांची बहीण सरोज पाटील (Saroj Patil) यांनी दिला. (Sharad Pawar should create a leader like him and only then leave the chair: sister's advice)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (ता. २ मे) लोक माझे सांगाती भाग दोनच्या प्रकाशनावेळी आपण आता अध्यक्षपदावरून पायउतार होत आहे, अशी घोषणा केली होती. त्याचे राज्यात पडसाद उमटत आहेत. त्यांच्या भगिनी सरोज पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी निवृत्त होण्याची केलेली घोषणा अतिशय धक्कादायक आहे. सध्या देशात अराजक माजलं आहे. लोकशाही जगते की नाही आणि आम्ही पुढच्या पिढीला काय देणार, असे प्रश्न पडत आहेत. जाती जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. अतिशय अस्वस्थ वातावरण असताना शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे खूप मोठा धक्का बसला आहे, लोक रडत आहेत. ते अस्वस्थ झाले आहेत.

अतिशय दुःखदायक वातावरण निर्माण झालेले आहे. कार्यकर्त्यांना हा धक्का पचेना, अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. आतापासूनच उपोषण, मोर्चे निघायला लागले आहेत. मी तर घरचीच आहे. त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणारे लोक आहेत. कठीण परिस्थितीत त्यांनी आपला पक्ष सांभाळला. सगळे साथीदार निघून गेले, तरी ते कधी डगमगले नाहीत, असेही पाटील यांनी नमूद केले.

सरोज पाटील म्हणाल्या की, सध्या ईडीचं संकट आहे, संविधान पायदळी तुडवलं जात आहे. अशा परिस्थितीत देशाला शरद पवार यांची खूप गरज आहे. त्यांच्याएवढा खंदा विरोधी पक्षनेता दुसरा कोणी दिसत नाही. प्रचंड अभ्यास, लोकांशी संबंध, कितीही टिका झाली तर वाईट शब्दांत त्यांनी कधीही उत्तर दिलेले नाही. सुसंस्कृत असं व्यक्तीमत्व त्यांचं आहे. नेमकं त्यांनीच अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, याबद्दल मला अतिशय दुःख वाटतंय. मला असं वाटतंय की, त्यांनी राजीनामा मागे घ्यावा.

पवारांच्या निर्णयाची दुसरी बाजूही आपण समजून घेतली पाहिजे. ते म्हणतात की, आता कुठल्याही गोष्टीचा मोह होता कामा नये. मी पुष्कळ वर्षे पदावर राहिलो आहे. आता प्रकृतीही तेवढीशी साथ देत नाही. वय वाढतंय. त्यांचं म्हणणं असं आहे की, पर्यायी माणूस तयार व्हायला पाहिजे. ते म्हणतात, ते सर्व बरोबर आहे. पण, पवारांनी त्यांच्यासारखंच पर्यायी नेतृत्व तयार करावं. मगच खुर्ची सोडावी. आमच्यासमोर तरी तुमचा सारखा पर्यायी नेता दिसत नाही. आमच्या महाराष्ट्राचं मोठ नुकसान होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुबळा होईल. लोक चाचपडत आहेत, अस्वस्थ झाले आहेत. लोकांच्या भावना समजून पवारांनी हा निणर्य मागे घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

पाटील म्हणाल्या की, एक बहीण म्हणून मला असंही वाटतंय की, ते खूप वर्षे आम्हाला हवे आहेत. त्यांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे. आम्हा सर्व बहीण भांवडांना ते हवेहवेसे वाटतात. म्हणून ते खूप वर्षे जगले पाहिजेत, असा आमचा स्वार्थही आहे. पण, जनतेच्या भावनांचा विचार शरद पवारांनी करावा, असं मलाही वाटतंय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT