Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
विशेष

Sharad Pawar Letter to CM, DCM: शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह अजितदादांना पत्र...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या घसरत्या शैक्षणिक दर्जाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाही ते पत्र पाठविले आहे. अजित पवारांच्या बंडानंतर पत्राद्वारे प्रथमच शरद पवारांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. (Sharad Pawar's letter to Chief Minister and Ajit Dada...)

राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे की, सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र, आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे, ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० (पीजीआय) अहवालानुसार महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. राज्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ज्या निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, पायाभूत सुविधा, बदलती शैक्षणिक प्रक्रिया आदी मुद्द्यांचा समावेश होतो. परंतु परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.0 (पीजीआय) अहवालानुसार महाराष्ट्रात या महत्वपूर्ण घटकांना गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसून येत नाही. याच कारणास्तव राज्य म्हणून शैक्षणिक गुणवत्तेत खूपच मागे पडलो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे निरीक्षणही पवार यांनी नोंदविले आहे.

पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने, मागील वर्षी ‘दोन शिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर एक दिवसाची परिषद घेऊन काही निरीक्षणे नोंदविली होती. यासोबतच बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या दृष्टीकोनातून काही सूचना देखील केल्या होत्या. राज्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ३८ हजार दोन शिक्षकी शाळा आहेत. त्या प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर असून विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याने त्या बंद करण्याची चर्चा अधूनमधून होत असते, शासनाने त्याची गंभीर दाखल घेणे अतिशय गरजेचे आहे.

खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात. या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासन आणि विशेषतः शालेय शिक्षण मंत्रीमहोदयांनी याचा गांभीर्याने विचार करावा. याबाबत सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक बोलावून आवश्यक कृती कार्यक्रम तयार करावा. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे, असेही पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT