Gajanan Kirtikar
Gajanan Kirtikar Sarkarnama
विशेष

Shiv Sena News : शिवसेनेला लोकसभेच्या २२, तर विधानसभेच्या १२६ जागा सोडाव्याच लागतील : गजानन कीर्तीकरांनी भाजपला सुनावले

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : भाजप आणि शिवसेना आम्ही २०१९ मध्ये युती करून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. विधानसभेला शिवसेना १२६ जागा, तर १६२ जागा भाजप लढली आहे. लोकसभेला भाजपला २६, तर आम्हाला २२ जागा मिळाल्या होत्या. तो फॉर्म्युला कायम राहिला पाहिजे. लोकसभेला २२, विधानसभेला १२६ जागा आमच्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. काही जागांची अदलाबदल होईल, पण आकडे बदलले जाणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना काय कमजोर नाही, असे शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी भाजपला ठणकावून सांगितले. (Shiv Sena will have to vacate 22 Lok Sabha and 126 Assembly seats : Gajanan Kirtikar)

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यंतरी शिंदे गटाला ५० जागा सोडण्याबाबत विधान केले हेाते. त्या पार्श्वाभूमीवर कीर्तीकर बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांना शिंदे गटाचा व्हीप लागू होऊ शकत नाही. विधानसभा, लोकसभेतली स्थिती वेगळी आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गडगडले आणि शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. आम्ही एवढे दिवस राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होतो. मात्र, मधल्या काळात आम्ही फारकत घेतली होती. मात्र, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रतिनिधी ’एनडीए’मध्ये जावा, यासाठी संजय राऊत यांची हकालपट्टी करून माझी संसदीय नेतेपदी नेमणूक करण्यात आली.

सध्याची परिस्थिती पाहून मलाच काय कुठल्याही शिवसैनिकाला दुःख होतं. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्याचे दुःख आहे. पण, पक्ष वाचविण्यासाठी पक्षप्रमुख म्हणून पावलं टाकायला हवी होती. ती टाकली गेली नाहीत, समेट व्हावी, अशी इच्छा आम्ही १६ खासदारांनी उद्वव ठाकरे यांना केली हेाती. पण, ते झाले नाही. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचे तुम्ही स्वीकारावे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करावी, अशी विनंती केली हेाती. मात्र, तशी पाऊले पडली नाहीत. आता समेट होणे शक्य नाही, असेही कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानमंडळातील भेट हा योगायोग होता. त्यातून त्यांच्या एकोपा झाला आहे, असे मला तरी वाटत नाही, असे मत फडणवीस-ठाकरे भेटीवर करत कीर्तिकर म्हणाले की, आपल्या पक्षाचे स्वातंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी जाहीर सभेत बोलावं लागते, त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत एकनाथ शिंदे यांच्यावर टिपण्णी केली.

मुलगा ठाकरेंसोबत का राहिला? : कीर्तिकरांनी दिले हे उत्तर ...

उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचा आम्हाला त्रास होत होता. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. आमच्या मनातील जी शिवसेना होती, त्यापासून उद्धव ठाकरे हे फारकत घेत होते. ठराविक लोकांनी उद्धव ठाकरे यांना घेरले होते, तेच त्यांचे सल्लागार होते. या गोष्टीचा अनुभव मला होता. मात्र, माझा मुलगा अमोल याला नव्हता, त्यामुळे तो उद्वव ठाकरे यांच्यासोबत राहिला. राष्ट्रवादीसोबत जाणं घातक वाटत होतं, त्यामुळे मी एकनाथ शिंदेसोबत गेलो, असे स्पष्टीकरण कीर्तिकर यांनी मुलाच्या शिवसेनेत राहण्याबाबत दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT