Eknath Shinde-Shivajirao Adhalrao Patil
Eknath Shinde-Shivajirao Adhalrao Patil  Sarkarnama
विशेष

आढळरावांचा शिवसेनेला अखेर ‘जय महाराष्ट्र’; हकालपट्टीच्या अपमानाचे उट्टे काढले!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : हकालपट्टीच्या वृत्तानंतर कमालीचे दुखवालेले शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावत शिवसेनेला (shivsena) अखेर ‘जय महाराष्ट्र’ केला. गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडीमुळे आढळराव शिवसेनेत मनाने राहिले नव्हते. त्यामुळे त्यांनी आज शिंदे गटाच्या बैठकीला लावलेली हजेरी आश्चर्य न वाटणारी आहे. (Shivajirao Adhalrao Patil Entry into Eknath Shinde group; Jai Maharashtra to Shiv Sena)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांची आज बैठक झाली. त्या बैठकीला शिवसेनेचे माजी खासदार असलेले आढळराव यांनी हजेरी लावली. याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारीणी जाहीर केली. विशेष म्हणजे शिंदे यांनी शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली आहे. नव्या कार्यकारिणीत शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड उपनेतेपदी केली आहे. त्यामुळे आढळरावांनी आपल्या स्वभावाप्रमाणे शिवसेनेत झालेल्या अपमानाचे उट्टे काढले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून ३ जुलै रोजी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीचे वृत्त आले होते. त्यावेळी आढळराव यांनाही काय प्रतिक्रिया द्यावी, हे सूचत नव्हते. त्यानंतर मात्र तातडीने हालचाली करत त्यांची हकालपट्टी मागे घेण्यात आली होती. मात्र, त्या वृत्तामुळे आपली बदनामी झाली. शिवसेनेत माझी काय किंमत आहे, हे मला आता कळलं आहे. आता मी अस्वस्थ झालो आहे. काही दिवसानंतर मी पुढच्या निर्णयाबाबत बघू, असे सूचक वक्तव्येही त्यांनी त्यावेळी केले होते.

हकालपट्टीच्या बातमीनंतर खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटील यांना फोन करून त्यांची समजूत घातली होती. तसेच मातोश्रीवर चर्चेसाठी बोलावले होते. त्या ठिकाणी मात्र त्यांना वेगळाचा प्लॅन देण्यात आला. त्यानुसार आढळराव पाटील यांनी शिरूरमधून लढण्याचा विचार सोडून द्यावा. शिरूरऐवजी आढळरावांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला, त्यामुळे शिवसेनेत राहून आपली राजकीय कारकिर्द संपविण्याऐवजी त्यांनी शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेत आज त्यांनी बोलावलेल्या बैठकीला आढळराव यांनी हजेरी लावली.

हकालपट्टीनंतर आढळराव काय म्हणाले होते

गेल्या १८ वर्षांपासून शिवसेना टिकविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत संघर्ष केला आणि अजूनही करत आहे. कुटुंब, व्यवसाय सोडून पक्षनिष्ठेने काम करतोय, तरीही पक्षाने केलेली हकालपट्टी माझ्या जिव्हारी लागली आहे. या हकालपट्टीने माझी जी बदनामी झाली, ती कधीच भरुन निघणारी नाही. आता मी अस्वस्थ झालोय. पक्षाने हकालपट्टी मागे घेत हे चुकीने घडल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, पक्षात माझी काय किंमत आहे, हे आता मला कळलंय, असे विधान वक्तव्यमाजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT