Dinvishesh 5 October Sarkarnama
विशेष

5th October in History- प्रतिबंधात्मक वटहुकूम, एचएमटीचे उद्घाटन

Rashmi Mane

१९७९ मध्ये केंद्रात चरणसिंग यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकार होते. त्यावेळी जनता पक्षात कुरबूरी सुरु झाल्या होत्या. अशातच साठेबाज, काळाबाजार करणारे आणि नफेखोर यांच्या प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करण्याचा निर्णय तेव्हाच्या मंत्रीमंडळाने घेतला.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणीच्या काळात मिसा कायदा केला होता. त्यात प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद होती. त्यानंतर हा कायदा नंतरच्या सरकारने रद्द केला. आजच्याच दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर, १९७९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी यांनी स्वाक्षरी केली.

एचएमटीचे नेहरूंच्या हस्ते उद्घाटन

भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर उद्योग क्षेत्र विकसित करण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले. यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे हिंदुस्थान मशिन टुल्सची म्हणजेच एचएमटीची स्थापना. मशिन टुल्स उत्पादक कंपनी म्हणून या कंपनीची सुरुवात झाली.

एचएमटी लोकप्रिय झाली ती तिच्या घडाळ्यांमुळे. १९६१ मध्ये ही उपकंपनी सुरु झाली. १९७० आणि १९८० च्या दशकात एचएमटी भारतातली सर्वात मोठी घड्याळ उत्पादक व पुरवठादार कंपनी होती. या कंपनीची जनता आणि पायलट ही घड्याळे लोकप्रिय होती. या कंपनीचे घड्याळाचे उत्पादन २०१६ मध्ये बंद झाले असले तरीही आजही एचएमटी ही कंपनी सरकार, संरक्षण दलांसाठी विविध उपकरणांचे उत्पादन करते.

भारताच्या औद्योगिक प्रगतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या एचएमटी चे उद्घाटन ५ ऑक्टोबर १९५५ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते.

Dinvishesh 5 October

दिनविशेष - 5 ऑक्‍टोबर

1878 - विजापूरनजीक वसलेल्या "तिकोटे' गावचे विष्णुपंत मोरेश्‍वर छत्रे यांनी स्थापन केलेल्या सर्कशीचा पहिला प्रयोग कुरुंदवाडला झाला. ही भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिली सर्कस होय.

1890 - तत्त्वज्ञ किशोरीलाल घनश्‍यामलाल मशरुवाला यांचा जन्म. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते "हरिजन' चे संपादक होते.

1974 - भारताचे माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे निधन.

1991 - "इंडियन एक्‍स्प्रेस' वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्यचळवळीतील ज्येष्ठ नेते रामनाथ गोएंका यांचे निधन.

1992 - नामवंत राजनैतिक मुत्सद्दी बॅ. परशुराम भवानराव ऊर्फ अप्पासाहेब पंत यांचे निधन. इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांत त्यांनी राजदूत व उच्चायुक्त म्हणून काम केले. सरकारने त्यांना 1955 मध्ये "पद्मश्री'ने गौरविले.

1997 - ज्येष्ठ संसदपटू आणि "फॉरवर्ड ब्लॉक'चे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन.

1998 - ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.

2001 - महाराष्ट्रावर प्रेम करणारे माजी ब्रिटिश सनदी अधिकारी थॉमस वॉटरफिल्ड यांचे निधन. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना निवृत्त करण्यात आले. तरीही त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारुन भारतातच राहण्याचे ठरविले. रवींद्रनाथ टागोर, लालचंद हिराचंद यांची आत्मचरित्रे तसेच साने गुरुजींचे "श्‍यामची आई' या पुस्तकांचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले आहे.

२०१२ - ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘धनुष्य’ या क्षेपणास्त्राची जहाजावरून यशस्वी चाचणी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT