sumitra jarange patil  Sarkarnama
विशेष

Maratha Reservation : आम्हाला त्यांची काळजी, पण ते समाजासाठी लढताहेत याचं समाधान

Prasad Shivaji Joshi

Manoj Jarange Wife : असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी समर्थपणे उभी असणारी स्त्री म्हणजे त्यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे पाटील.

मनोज जरांगे या संघर्ष योद्ध्याच्या संसाराची धुरा वाहणाऱ्या त्यांच्या पत्नी सुमित्रा या भरल्या डोळ्यांनी मनोज जरांगे यांच्या संघर्षाची कहाणी सांगत होत्या. त्या म्हणाल्या, की जीवनातील विविध प्रसंगांत आयुष्याच्या साथीदाराची सोबत हवी असते. मात्र, माझ्या पतींना सामाजिक कार्यात रस असल्याचे बघून मी त्यांना साथ द्यायचे ठरवले.

कुठल्या न कुठल्या सामाजिक कामात वेळ देत असल्याने ते कुटुंबाच्या वाट्याला फार कमी वेळा येतात. कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयात हल्ला झाला, त्यावेळी संघटनेचे कार्यकर्ते दीड वर्ष कारागृहात होते. ते बाहेर येईपर्यंत माझे पती घरी आले नव्हते. त्यावेळी खूप त्रास झाला. सध्या ते अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करत आहेत.

या वेळी आम्ही त्यांना पाहू शकतो. मात्र, दीड वर्ष घरी नसताना त्यांच्याविषयी प्रचंड काळजी वाटत होती. ते काय खात असतील, कसे राहत असतील हा विचार करून आम्ही सर्वजण तहान-भूक विसरून गेलो होतो. अखेर सर्व कार्यकर्ते कारागृहाच्या बाहेर आल्यानंतरच माझे पती घरी आले.

मागील 62 दिवसांपासून ते घरी आले नाहीत

अंतरवाली सराटी येथील सभेवेळी मुलगी पल्लवीला चक्कर आली. त्यावेळी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्याशी बोलणे झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा समाजबांधव आत्महत्या करत आहेत.

त्यासाठी सर्वस्वी राज्य शासन जबाबदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. त्या शपथेला जागून मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजबांधव आत्महत्या करत आहेत. मराठा समाजबांधवांना विनंती आहे की, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका, असे आवाहन सुमित्रा जरांगे यांनी केले.

घर चालवण्यासाठी सुमित्रा जरांगे यांची कसरत

आपच्या पतीची प्राथमिकता ही कुटुंबापेक्षा सामाजिक कार्य आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ती अत्यंत सकारात्मकतेने स्वीकारण्यासाठी फार मोठी हिंमत लागते. विशेष म्हणजे, घरी आर्थिक सुबत्ता नसताना संसाराचे रहाटगाडगे चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

ती कसरत सुमित्रा जरांगे कुठलीही तक्रार न करता समाधानाने करतात, हे कौतुकास्पद आहे. खरेतर त्यांच्या या पाठिंब्यामुळेच मनोज जरांगे यांनी पूर्ण क्षमतेने सामाजिक कार्याचे ध्येय निश्चित करून अवघे जीवन त्यासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे त्यांच्या लढ्यातील सर्वात मोठ्या शिलेदार सुमित्रा जरांगे आहेत, हे नक्की.

SCROLL FOR NEXT