Uddhav Thackeray-Mayawati
Uddhav Thackeray-Mayawati sarkarnama
विशेष

उद्धव ठाकरे यांनी मायावतींना फाॅलो केले : मी माझे म्हणणे सांगणार.. ना प्रश्न, ना उत्तरे!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पक्षफुटीनंतर आता थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या `मातोश्री` निवासस्थानाचे दरवाजे कार्यकर्त्यांसाठी पुन्हा खुले केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माध्यमांत विविथ प्रकारचे वृत्त येत असतात. त्याकडेही त्यांचे सूक्ष्म लक्ष आहे. पण आता त्यांनी माध्यमांना संबोधित करण्याची पद्धत बदलली आहे. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या प्रमुख मायावती यांची स्टाईल अंगिकारल्याचे दिसते.

शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे यांनी दोन वेळा पत्रकार परिषदा घेतल्या. त्या दोन्ही वेळेस ठाकरे हे स्वतःच बोलले. त्यांनी पत्रकारांना प्रश्न विचारण्याला संधीच दिली नाही. तसेच आज मातोश्रीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या विषयी त्यांनी स्पष्टपणे सांगितले. `मातोश्री`त अडीच वर्षांनंतर पत्रकारांना आज प्रवेश मिळाला. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाविषयी स्पष्टीकरण देत ते आपल्याकडेच राहणार असल्याचा दावा केला. त्यांचे निवेदन संपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यापुढेही अजून काही दिवस मलाच भरपूर बोलायचं असल्याचे सांगत पत्रकार परिषदेत यापुढेही एकतर्फी संवाद असणार असल्याचे स्पष्ट केले.

ही स्टाईल मायावती यांनी रूढ केली आहे. त्या कधीच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. पत्रकार परिषदेत त्या आपल्या निवेदन वाचून दाखवतात आणि थेट निघून जातात. मग त्यांच्या विधानांचे अर्थ लावण्याचे पुढचे काम पत्रकारांनी करायचे, असा हा सारा मामला आहे. ठाकरे यांनीही आपण प्रश्न घेणार नसल्याचे सांगत पत्रकारांनी आपण सांगेल तेवढे ऐकावे, असा परिपाठ स्वीकारल्याचे दिसून येत आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर पत्रकार परिषदही घेत नाहीत. त्या तुलनेत ठाकरे आणि मायावती या किमान संवाद (एकतर्फी) तरी ठेवत आहेत.

ठाकरे काय म्हणाले?

विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. जर आम्ही चूक केली असेल तर जनता आम्हाला घरी बसवेल. जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य असेल. ते जर चुकले असतील, तर जनता त्यांच्याबद्दल जो निर्णय घेईल तोदेखील मान्य करावा लागेल असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेतून बंडाळी करून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह भाजपलाही ललकारत विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली.

'मलाही वाईट वाटते आहे. पण माझ्या काही बोलण्याने शिवसैनिकांवरल दडपण वाढू शकते. शिवसैनिकांवर दडपण वाढेल असे कुठलेही वक्तव्य मी यावेळेला करणे चूक ठरेल. पण मलाही भावना आहेत. शिवसेनाप्रमुखांचं एक एकाने विचारले होतं, तुम्हाला वाईट वाटतं की नाही0 ते म्हणाले होते की माशाच्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसत नाहीत. ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या वाक्यातून या राजकीय घडामोडींमुळे होत असणारे क्लेष अधोरेखित केले.


शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याची किंवा निवडणूक आयोगाकडून गोठविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेचे खंडन करताना ठाकरे म्हणाले, कायद्याने जे नमूद केलंय, त्यानुसार धनुष्यबाण कुणीही शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची 'लक्षणं' देखील मतदार पाहतात. घटनेच्या अभ्यासकांच्या मते धनुष्यबाण चिन्हावर इतर कोणी हक्क सांगू शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT