Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray Sarkarnama
विशेष

MVA News: सर्व्हेमुळे ठाकरे गटाची धडधड वाढली; 'मविआ'त काँग्रेसच सर्वाधिक जागा लढणार

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. विशेषतः काँग्रेसने 13 जागी विजय मिळवल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात आघाडीतील तीन घटक पक्षात जागावाटपावरून रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे. त्यामुळेच काँग्रेसने 288 मतदारसंघाचा सर्व्हे केला आहे.

तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी करताना आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. आघडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सर्वाधिक जागा कोणाला मिळणार यावरून चुरस असतानाच आता काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विधानसभेला सर्वाधिक जागा लढण्याची रणनीती काँग्रेसने आखली असल्याचे समजते.

काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार शिवसेना ठाकरे गटाच्या 40 ते 45 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये ठाकरे गटाला जादा जागा देऊ नये, असा एक मतप्रवाह आहे. तर दुसरीकडे या पेक्षा अधिक जागा काँग्रेसला (Congress) विधानसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच काँग्रेसच्या जागा गेल्या वेळेसच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येत्या काळात विधानसभेसाठी काँग्रेसने सर्वाधिक जागा लढण्याची रणनीती आखली असल्याचे समजते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा लढल्या होत्या तर 13 जागी विजय मिळवला होता. या मुळे काँग्रेसचा स्ट्राइक रेट जवळपास 70 टक्के इतका आहे तर शिवसेना ठाकरे गटाने 21 जागा लढल्या होत्या तर 9 जागी विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट 50 टक्कयांपेक्षा कमी आहे. तर शरद पवार गटाने दहा जागी निवडणूक लढली होती तर 8 जागी विजय मिळवल्याने त्यांचा स्ट्राइक रेट 80 टक्के इतका आहे. त्यामुळेच या वेळेस काँग्रेस सर्वधिक जागा लढण्याची तयारी करीत असल्याचे समजते.

गेल्या काही निवडणुकीत काँग्रेसपासून दुरावलेला मुस्लिम, दलित व आदिवासी हा मतदार पुन्हा काँग्रेससोबत जोडला गेला आहे. तर ठाकरे गटाचा मराठी मतदार मुंबई व कोकणात दुरवल्याने शिवसेनेला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळेच येत्या काळात ठाकरे गटाने काँग्रेसपेक्षा कमी जागा लढल्या तरच राज्यात महाविकास आघाडीला बहुमतासाठी अपेक्षित असलेला 145 चा जादुई आकडा गाठता येणे शक्य होणार आहे.

त्यामुळेच ठाकरे गटाने कमी जागा लढवाव्यात, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. या सर्व्हेची दखल काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने देखील घेतली आहे. त्यामुळेच काँग्रेसने आता मुंबईत 34 पैकी 16 जागा लढणार असल्याचे समजते. दुसरीकडे मराठवाड्यातील जागावरून काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट यांच्यात संघर्ष होईल, असे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे.

काँग्रेसने केलेला हा अंतर्गत सर्व्हे शिवसेनेच्या पथ्यावर पडला असून त्यामुळेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर करण्यास काँग्रेसने नकार दर्शवला असल्याचे समजते. त्यामुळेच ज्यांच्या जागा जास्त त्यांना मुख्यमंत्रीपद, अशी भूमिका त्यांनी घेत उद्धव ठाकरे यांची आघाडीच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती केली असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. त्यामुळे येत्या काळात लवकरच आघाडीच्या जागावाटप करताना काँग्रेस ठाकरे गट व पवार गटाला किती जागा देणार? याची उत्सुकता लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT