Uddhav Thackeray-Milind Narvekar Sarkarnama
विशेष

Milind Narvekar Victory Vishleshan : ठाकरेंची स्ट्रॅटेजी अन्‌ नार्वेकरांचे सर्वपक्षीय ‘मैत्र’ आले कामी...!

Vijaykumar Dudhale

Mumbai, 12 July : विधान परिषदेच्या निवडणुकीत हातात हक्काची केवळ 16 मते असतानाही केवळ सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे ‘मैत्र’ कामी आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार तथा उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली. त्यांचा हा विजय अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीनंतरच्या बंडामुळे झालेल्या भळभळत्या जखमेवरील फुंकर ठरणारा आहे.

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) अकरा जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात सत्ताधारी महायुतीकडून नऊ उमेदवार, तर विरोधी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यात सर्वाधिक चुरशीच्या असलेल्या या जागेवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या रुपाने आपला मोहरा उतरवून निर्णायक डाव टाकला होता.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सध्या विधानसभेत 15 आमदार आहेत, याशिवाय शंकरराव गडाख यांच्या रुपाने एक अपक्ष आमदारही ठाकरेंसोबत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार निवडून येण्यासाठी 23 आमदारांची गरज होती. ठाकरेंच्या हाती तर केवळ 16 आमदार होते. मात्र, मित्रपक्ष काँग्रेसकडे 37 आमदार होते.

काँग्रेसने प्रज्ञा सातव यांच्या रूपाने एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. सातव यांच्या विजयानंतरही त्यांच्याकडे 14 अतिरिक्त मत शिल्लक राहात होती. त्याच 14 मतांवर ठाकरेंची मदार होती, ती मते शिवसेनेकडे वळविणे कसरत होती. मात्र, उद्धव ठाकरे आणि नार्वेकरांनी ती यशस्वीपणे पार पाडली.

आपल्या विश्वासू सहकाऱ्याला विधीमंडळात पाठविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कंबर कसली होती. त्यामुळेच ते सकाळी साडेदहालाच विधीमंडळात दाखल झाले होते. विधीमंडळातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बसून त्यांनी निवडणुकीची सूत्रे हलवली. काँग्रेसचे जे आमदार फुटण्याची चर्चा होती, त्या आमदारांशी ठाकरेंनी स्वतः ‘वन टू वन’ संवाद साधला. त्यामुळे नार्वेकरांचा विजय सुकर झाला.

ठाकरेंनी आखलेली रणनीती तर यशस्वी ठरली. शिवाय मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे संबंधही या निवडणुकीत कामी आले आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनातही नार्वेकरांविषयी हळवा कोपरा होता. त्यांच्याबरोबर शिंदेंचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध आहे, त्यामुळे इतर कोणत्याही उमेदवारापेक्षा नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांच्या मनात जवळचेचे होते, त्याचा फायदा नार्वेकरांना झाला.

विरोधी भाजप आणि शिवसेनेचे सरकार असतानाही मिलिंद नार्वेकर यांची तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर त्यांची पुन्हा झालेली नियुक्ती यांसारख्या गोष्टींतून त्यांचे सर्वपक्षीय संबंध स्पष्ट होत होते, त्याचा अचूक फायदा ठाकरेंनी नार्वेकरांची उमदेवारी घोषित करून घेतला आणि विधान परिषद निवडणुकीत डाव साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT