Vishwajeet kadam. Vishal Patil, Jayant Patil Sarkarnama
विशेष

Sangli Politics : सांगलीत विश्वजीत कदमांची चाल; विशाल पाटलांचा विजय अन् जयंत पाटील 'चेकमेट'!

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात महायुतीविरोधात एकएक जागा जिंकून भाजपला नामोहरम करण्याच्या हेतून महाविकास आघाडीने नियोजन केले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही देशाचे लक्ष महाराष्ट्र कुणाला कौल देणार, याकडे होते. असे असतानाही सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत ठाकरे गटाने कुणाशीही चर्चा न करता आपला उमेदवार दिला आणि काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.

त्यानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसमधे धुसफूस सुरू झाली. मात्र जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शांत होते. त्यामुळे सांगलीकरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. याला राजारामबापू आणि वसंतदादा यांच्यातील जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा सुरू झाली.

सांगलीवरुन आघाडीतील काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र या आणीबाणीच्या काळात काँग्रेसने आघाडी धर्म पाळण्याचा निर्णय घेतला. यातून गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी करत असलेल्या विशाल पाटलांनी Vishal Patil थेट अपक्ष अर्ज दाखल करत आघाडीसह महायुतीच्या उमेदवारापुढे आव्हान उभे केले. आता पाटलांपुढे लोकसभा जिंकून सांगली हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे, हे दाखवून द्यावे लागणार होते. त्यात यश मिळाले असून विशाल पाटलांनी तब्बल लाखभर मतांनी विजय संपादन केला.

सांगलीच्या या निवडणुकीने आता पश्चिम महाराष्ट्रात कोणाचे नेतृत्व आहे, याचा फैसला केला आहे. तसेच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्यातील राजकीय नेतृत्वाचीही लढाईचाही निकाल या निवडणुकीने लावला आहे. ठाकरे गटाने सांगलीवर दावा ठोकताच कदम आणि विशाल पाटील यांच्यावर दिल्लीवाऱ्या करण्याची वेळ आली.

दुसरीकडे काँग्रेसचे नेतेही बोलते होते. मात्र जिल्ह्यातील जयंत पाटील Jayant Patil यांनी मात्र याबाबत मौन बाळगल्याने अनेक प्रश्नांना तोंड फुटले. आता त्या प्रश्नांची उत्तरे कदम यांनी विशाल पाटलांच्या विजयातून दिलेली आहेत. मात्र हा सुरू झालेल्या नेतृत्वाचा संघर्ष पुढे विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीव्र होण्याची शक्यता आहे.

सांगलीत ठाकरे गटाचा एकही संरपंच नसताना थेट लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याचे धाडस कसे झाले? जिल्ह्यात अनेक निष्ठावान कार्यकर्ते असतानाही तीन पक्षांचे उंबरे झिजवून आलेल्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी कशी मिळाली? तसेच ताकद असतानाही आघाडीत काँग्रेसच्या हातून ही जागा जातेच कशी? त्यावर जिल्ह्यातील जयंत पाटलांसारखे नेतृत्व चकार शब्दही का काढताना दिसत नाहीत? आदी प्रश्नांनी सांगलीकरांना भांडावून सोडले होते. यांची उत्तरे शोधताना सांगलीकरांना जयंत पाटलांचे वडील राजारामबापू आणि विशाल पाटलांचे आजोबा वसंतदादा यांच्यातील वादाचा वास लागल्याचे बोलले जाते.

सांगलीवरून सुरू झालेल्या चर्चांना उत्तर देताना जयंत पाटलांनी, माझा आणि विशाल पाटलांना उमेदवारी न मिळण्याचा काही संबंध नाही. हा प्रश्न ठाकरे गट आणि काँग्रेसचा आहे, असे वारंवार सांगितले. तसेच या वादातून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सांगलीकरांनी लाखभर मतांनी अपक्ष विशाल पाटलांना विजयी केले. तर ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांना डिपॉजिटही वाचवता आलेले नाही. आता विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासोबत विश्वजीत कदम होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT