Gopinath munde, Balasheb thackeray  sarakrnama
विशेष

Bal Thackeray Birth Anniversary: गोपीनाथ मुंडेंना विरोधकांनी घेरले, तेव्हा बाळासाहेब पाठीशी उभे राहिले...

Jagdish Pansare

Chhatrpati Sambhajinagar : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दिलदारपणाचे अनेक किस्से राज्याच्या राजकारणात आजही चर्चिले जातात. शिवसेना-भाजप या दोन पक्षांमधील युतीत अनेक वेळा वादळं आली, संकटं आली, जागावाटपावरून खेचाखेची झाली, ती तुटली नाही, याचे श्रेय बाळासाहेबांच्या दिलदारपणालाच जाते. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन या दोन नेत्यांमुळेच महाराष्ट्रातील शिवसेनेशी युती टिकून होती, असे बोलले जाते.

बाळासाहेबांनीही या दोन नेत्यांकडे पाहूनच कदाचित एखादे पाऊल मागे घेतले असेल. राज्यात 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर येऊन मनोहर जोशी (Manohar Joshi) मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. मुंडे यांच्याकडे गृहखात्याचाही कारभार होता. त्यामुळे ते कायम विरोधकांच्या निशाण्यावर असायचे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंडेंना अडकवण्याच्या संधीची वाट पाहत असलेल्या विरोधकांच्या हाती समाजवेक अण्णा हजारे यांच्या एका आरोपाने आयते कोलित हाती लागले. गोपीनाथ मुंडे आणि बरखा पाटील नावाच्या एक तमाशा कलावंताचा संबंध काय? तिला पुण्यात मुंडेंनी फ्लॅट कसा दिला? असा प्रश्न हजारे यांनी उपस्थित केला. मग काय विरोधकांनी हा मुद्दा घेऊन राज्यभरात मुंडेंच्याविरोधात रान पेटवले.

मुंडे यांच्या संघर्षयात्रेमुळेच राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता गेली होती. याचा राग विरोधकांच्या मनात होता, त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींचे भांडवल करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. लातूर जिल्ह्यात एका शीतल नावाच्या मुलीच्या दाखल्यावर शीतल गोपीनाथ मुंडे असा उल्लेख आढळल्याच्या प्रकरणानेही याच काळात उचल खाल्ली. पण बरखा प्रकरणावरून गोपीनाथ मुंडे यांची विरोधकांकडून सातत्याने कोंडी केली जात होती.

सार्वजनिक जीवनात राजकीय नेत्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले तर त्याची कारकीर्द अडचणीत येते. गोपीनाथ मुंडे त्याच मार्गावर असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balashaeb Thackeray) त्यांच्या मदतीला धावून आले. एका जाहीर कार्यक्रमात बाळासाहेबांनी बरखा प्रकरणाचा उल्लेख केला.

मुंडेंनीही घाबरायचं कारण नाही

'आमचे मुंडे सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. काय ते बरखा वगैरे प्रकरणावरून म्हणे त्यांनी राजीनामा द्यावा. अरे कशाला पाहिजे राजीनामा, मुंडेंनीही घाबरायचं कारण नाही, अरे प्यार किया तो डरना क्या,' असे म्हणत बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची पाठराखण केली होती. बाळासाहेबांनी जाहीरपणे मुंडेंचा बचाव केल्यानंतर विरोधकांच्या विरोधाची धारही नंतर कमी झाली होती.

(Edited By : Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT