यंदा जूनचा अर्धा महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. 4 जूनला मॉन्सून वाऱ्यांनी केरळमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर मॉन्सून वाऱ्याची वाटचाल अचानक मंदावली. त्यामुळे अजून अनेक भागामध्ये पावसाचा अजून पत्ता नाही. पाऊस न आल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. राज्यातील अनेक भागातील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाला समोरे जावे लागत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, 4 जून ते 18 जून या कालावधीत देशात सरासरीपेक्षा तब्बल 41 टक्के कमी पाऊस झाला आहे. या काळात 72.2 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ 42.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर अनेक भागांमध्ये मॉन्सूनची वाटचाल अनेक दिवसांपासून ठप्प झाली आहे. हवामान विभागाने यामागे काही महत्त्वाची कारणे स्पष्ट केली आहेत.
पहिले कारण म्हणजे अरबी समुद्रातून येणाऱ्या दमदार ओलसर वाऱ्यांचा अभाव. सामान्यतः हे वारे मोठ्या प्रमाणात आर्द्रता घेऊन येतात आणि पावसाला चालना देतात. मात्र यंदा त्यांची ताकद कमी आहे. याशिवाय प्रशांत महासागरात विकसित होत असलेल्या अल-नीनोचा परिणामही मॉन्सूनवर होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
दुसरे कारण म्हणजे दक्षिण-पश्चिमेकडील वारे कमकुवत होणे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह अंतर्गत भागांपर्यंत पुरेशी आर्द्रता पोहोचत नाही. त्याचवेळी कोरडे वारे मॉन्सूनच्या पट्ट्यात प्रवेश करत असल्याने ढगांची निर्मिती कमी होत आहे.
तिसरे कारण म्हणजे कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्री परिस्थिती तयार होत नसल्याने पावसाला आवश्यक असलेली वातावरणीय ऊर्जा मिळत नाही.
चौथे कारण म्हणजे विषुववृत्त ओलांडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी होणे. हे वारे मॉन्सूनसाठी आवश्यक ओलावा आणतात. त्यांच्या कमकुवतपणामुळे पावसाची तीव्रता घटली आहे.
पाचवे कारण म्हणजे मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) प्रणालीची निष्क्रिय अवस्था. ही प्रणाली सक्रिय असताना ढगांची निर्मिती आणि पावसाचे प्रमाण वाढते. मात्र सध्या ती हिंद महासागरापासून दूर असल्याने त्याचा परिणाम मॉन्सूनवर दिसून येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांत केवळ तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा हा मंदावलेला वेग आणि अल-नीनोचा संभाव्य प्रभाव यामुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भात, मका, सोयाबीन यांसारखी पिके वेळेवर होणाऱ्या पावसावर अवलंबून असल्याने पाऊस उशिरा झाल्यास शेतीसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.