Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
विशेष

MVA News : मविआत तिढा, नवाब मलिकांच्या विरोधात कोण उमेदवार असणार? ठाकरे गटाची मोठा मतदारसंघ सोडण्याची तयारी

Sachin Waghmare

Mumabai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाला शनिवारी मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. मुंबईतील 36 जागासाठी पहिल्यांदाच बैठक पार पडली. या वेळी आघाडीतील तीन घटक पक्षाचे प्रमुख नेते बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत सर्वाधिक जागेची मागणी करीत ठाकरे गटाने मुंबईत आपणच मोठे भाऊ असल्याचे सांगत 36 पैकी 20 जागांवर दावा केला आहे.

त्यातच महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांनी एकाच जागेवर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात एकाच जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट वांद्रे पूर्वेच्या बदल्यात काँग्रेसला त्यांच्या हक्काची एक जागा सोडणार आहे. ही जागा ठाकरे गटाला वरुण सरदेसाई यांच्यासाठी हवी असल्याचे समजते. (MVA News)

महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाने मुंबईतील 36 पैकी 20 जागांवर दावा केला. त्यामुळे ठाकरे गटाने शरद पवार गट आणि काँग्रेसला (Congress) केवळ 16 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत तीन जागांवर विजय मिळवला. तर एका जागी ठाकरे गटाचा निसटता पराभव झाला होता. तर मुंबईत काँग्रेस, भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. त्यामुळे ठाकरे गटाने मुंबईतील जास्तीत जास्त जागांवर दावा सांगितल्याचे समजते.

2019च्या विधानसभा निवडणुकीमधील पक्षीय बलाबल पहिले तर भाजपला मुंबईत 16 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला 14 तर काँग्रेसला चार जागा जिंकता आल्या होत्या. समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा जिंकता आली होती. त्यामुळे मुंबईतील वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबईतील पाया पक्का करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असल्याचे समजते.

एकाच मतदारसंघावर तीन पक्षाचा दावा

या बैठकीत अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघावरून पेच निर्माण झाला आहे. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असून याठिकाणी माजी मंत्री नवाब मलिक निवडून आले होते. पण मलिक सध्या हे अजितदादा गटात आहेत. त्यामुळे या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसने दावा केला आहे.

ही जागा सोडण्यास शरद पवार गट तयार नाही. पवार गटाला अणुशक्ती नगरमधून रवींद्र पवार यांना मैदानात उतरवायचे असल्याचे समजते तर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला या मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली होती. त्यामुळे ठाकरे गटाला ही जागा हवी असल्याने येत्या काळात आघाडीत या जागेवरून वाद रंगण्याची शक्यता आहे.

ठाकरे गट करणार 'या' जागेची अदलाबदल

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने वांद्रेपूर्वेच्या जागेवर दावा केला आहे. वांद्रे पूर्वेची जागा सध्या काँग्रेसकडे आहे. पण ठाकरे गटाला वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्वेमधून रिंगणात उतरवायचे आहे. त्यामुळे त्यांना ही जागा बदल करून हवी आहे. त्या बदल्यात शिवसेना त्यांची कांदिवलीची जागा काँग्रेसला सॊडण्यासाठी ठाकरे गट तयार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या सहमतीने हा बदल होणार आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीत तीन पक्षात चर्चा झाली. यावेळी तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी जागावाटपासॊबतच विविध महत्वपूर्ण विषयासह यावेळी प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT