Rahul Gandhi-Nana Patole Sarkarnama
विशेष

Dispute in MahaAghadi : झिरवळांनी शिवसेना बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई का केली नाही : पटोलेंचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी अजित पवारांना भेटून माहिती दिली होती. त्यामुळे माहिती नाही, असे म्हणणारे अजित पवार खोटं बोलत आहेत. अध्यक्षपदावर मी नव्हतो, पण उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे होते. त्यांना माझे संपूर्ण अधिकार होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता आली असती. पण, त्यांनी ती कारवाई केली नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपाध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. (Why Narahari Ziraval did not take disqualification action against rebel MLAs of Shiv Sena: Nana Patole)

विधानसभेचे अध्यक्ष असते तर त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर १६ आमदारांना अपात्र ठरवलं असतं, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते. तसेच, नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनामा दिल्यानंतर मला माहिती झाले, असा आरोप केला होता. त्याला पटोले यांनी दिल्लीत उत्तर दिले.

पटोले म्हणाले की, अजित पवार हे खोटे बोलत आहेत. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी मी, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो. त्यांना सांगितलं की, मला पक्षश्रेष्ठींचा आदेश आलेला आहे, त्यामुळे मला राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यावेळी त्यांनी ‘आता राजीनामा देऊ नका, घाई करू नका’, एवढं मला सांगितलं होतं. राजीनामा देण्यापूर्वी त्यांना भेटून सांगितलं होतं. माहिती नव्हतं, असं जर अजितदादा म्हणत असतील तर ते स्पशेल खोटं बोलत आहेत.

मी विधानसभेच्या अध्यक्षपदावर नव्हतो. पण उपाध्यक्ष तर राष्ट्रवादीचा होता. त्यांना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता आली असती. ती त्यांनी केली नाही. उपाध्यक्ष हे राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ होते. त्यांना माझे अधिकार हेाते, त्यांनी ते वापरायला पाहिजे होते, त्यांनी ते वापरले नाहीत, असा आरोपही पटोले यांनी केला. ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आम्ही पहिल्यापासून तेच सांगत होतो की, राज्यपाल भवन हे भाजपाल भवन झालेले आहे. त्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेले आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी काहीही करण्याचा प्रयत्न संविधानिक पदावर बसून करत आहे.

उद्धव ठाकरेंना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत हेाते. मग, पहाटेच्या वेळी सरकार बनविताना नैतिकता पाळली होती का, असा सवालही पटोले यांनी फडणवीसांना केला. नैतिकतेचा विषय असेल तर भाजपला आजही संधी आहे. त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. तसेच, संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही पटोले यांनी नमूद केले.

विधानसभेचे अध्यक्ष असते तर हे सोळा आमदार अपात्र ठरले असते. असे अजित पवार म्हणतात. त्यावर पटोले म्हणाले की, मग त्यांचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळही म्हणतात की मी पण सोळा आमदारांना अपात्र करणार. ते कुठल्या आधारावर बोलत आहेत. त्यांना आताच जाग का आली, असे अनेक प्रश्न आहेत. मला त्यावर आता बोलायचे नाही, असे म्हणत पटोले यांनी याबाबत मौन पाळणेच पसंत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT