Satej Patil
Satej Patil Sarkarnama
विशेष

राज्याप्रमाणे ‘गोकुळ’मध्येही सत्तांतर होणार का..? सतेज पाटील स्पष्टच बोलले...

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : गोकुळ (Gokul), कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये (KDCC Bank) राज्यातील सत्तांतराचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण, एका प्रवृत्तीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी असलेल्या मतदारांनी निवडणूक लढवलेली आहे. ‘गोकुळ’मध्ये असणारी प्रवृत्ती हटविण्यासाठी स्वाभिमानी मतदारांनी विद्यमान पॅनेलला निवडून दिलेले आहे, त्यामुळे राज्यातील सत्तांतराचा ‘गोकुळ’मध्ये काही फरक पडणार नाही, असा विश्वास माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केला. (Will there be a change of power in Gokul Dudh Sangh? Satej Patil said...)

गोकुळ, जिल्हा बॅंकेत सत्तातराचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर कोल्हापूर विमानतळासंदर्भातील बैठकीला आल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी वरील दावा केला आहे. ते म्हणाले की, राज्यातील सत्ता बदलल्यामुळे ‘गोकुळ’मध्येही काही तरी घडेल, असे विरोधकांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण सत्ता असो किंवा नसो आम्ही २४ तास लोकांसाठी उपलब्ध असतो, त्यामुळे गोकुळ, कोल्हापूर जिल्हा बॅंकेत कोणाही परिणाम होणार नाही.

कोल्हापूर विमानतळासाठी जमीन संपादित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने २०० कोटींची तरतूद केली होती. काही जमिनी या तडजोडीने घ्याव्यात, यासाठी प्रशासनाने पाऊले टाकली आहेत. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लवकरात लवकर ६४ एकर जमीन ताब्यात मिळण्याची गरज आहे. ते लवकर व्हावे, यासाठी आम्ही बैठक आयोजित केली आहे. महाआघाडीचं सरकार असताना आठवड्याला बैठक घ्यायचो. पण आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तशा सूचना केल्या आहेत, असेही माजी पालकमंत्री पाटील यांनी नमूद केले.

लांबलेल्या निवडणुकीबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की पाच वर्षांतून एकदा डिलिमिटेशन व्हावे, अशी एक संकल्पना आहे. देशात २०११ पासून सेन्सेस झालेला नाही. त्याला अनुसरून काहीतरी लॉजिक लावून जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढविण्याचा निर्णय महाआघाडी सरकारने घेतला होता. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या ऑफिडिव्हिटमध्ये निवडणुका घेण्याचे मान्य केले आहे. निवडणूक घेतल्या नाहीत तर अवमानकारक कारवाई करावा लागेल, असे न्यायालयाकडूनही सांगण्यात आले आहे. असे असतानाही आता फक्त काहीतरी करायचं, असं दाखवलं जातंय. कारण सध्या जे सरकार आले आहे, त्याला जनतेची सहानुभूती नाही, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलायच्या हा एकमेव उद्देश यामागे दिसत आहे. सत्तेत असणारे भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जनतेकडून मतं मिळणार नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे निवडणुका कशा पुढे जातील, हा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारचा आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.

मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहून राज्यातील जनता कंटाळली आहे. येत्या आठ तारखेपर्यंत न झाल्यास आम्हाला खरंच मोर्चा काढावा लागतो की काय? अशी परिस्थिती दिसते आहे. नव्या सरकारकडून विकास कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. विकास कामांना दिलेली स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटले आहे. ही सार्वजनिक कामे आहेत, कुणाच्या घरची कामे नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. किमान शाहू महाराजांच्या समाधिस्थळाच्या कामाला तरी स्थगिती द्यायला नको होती. विचारपूर्वक या सर्व गोष्टी करायला पाहिजे होत्या, अशी आमची अपेक्षा हेाती, अशी खंतही सतेज पाटील यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT