Prithviraj Chavan Sarkarnama
विशेष

Winter Session 2023 : महाराष्ट्राचे 8 हजार कोटींचे नुकसान; पृथ्वीराजबाबांनी दाखवलेल्या 'जीआर'मध्ये काय आहे?

Vijaykumar Dudhale

Nagpur News : दोन वर्षांत निवडणुका न झाल्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारकडून सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार नाही. ज्या ठिकाणी प्रशासक आहे संस्थांनाही हा निधी मिळणार नाही. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने तसे परिपत्रक काढले आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. (Local bodies will not get 8 thousand crores from center due to non-elections ; Prithviraj Chavan)

आमदार चव्हाण म्हणाले की, पंधराव्या वित्त आयोगाच्या नियमाप्रमाणे 2021 ते 2026 या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज संस्थांना एकूण 22 हजार 713 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. सुमारे 22 हजार कोटी रुपयांचा हा महाराष्ट्राचा हक्काचा निधी आहे. ज्या ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी प्रशासक आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारचा निधी मिळणार नाही. तसे परिपत्रक ग्रामीण विकास मंत्रालयाने काढले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील दोन वर्षांत होणे अपेक्षित होते. मात्र, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे जवळपास आठ हजार कोटी रुपयांचा निधी आपल्याला केंद्र सरकारकडून मिळणार नाही. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की, केंद्राकडून आपल्याला हा निधी मिळाला तर पाहिजेच. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

निवडणुकांसाठीचे जे राजकीय आरक्षण आहे. तेही अद्याप संबंधित घटकांना मिळालेले नाही. हा राज्याच्या ग्रामीण भागावर नव्हे; तर संपूर्ण राज्यावरच अन्याय आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी तसेच, हा निधी मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन पृथ्वीराजबाबांनी सरकारला केले.

जोपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत. तोपर्यंत राज्य सरकारने केंद्र सरकारशी संपर्क साधावा. राज्याच्या हक्काचा निधी मिळवावा. समजा जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य नसतील तर तो निधी आमदारांच्या माध्यमातून वितरित करण्यात यावा, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT