भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि भारतात एकच संतापाची लाट उसळली. भारताने मदतीचा हात पुढे करूनही या देशाने युद्ध काळात भारतावरच हल्ले करण्यासाठी पाकिस्तानला मदत केले, अशी भारतीयांची भावना आहे. पण या मैत्रीला इस्लाम धर्माचा आधार आहे. तुर्की आणि पाकिस्तान कधीकाळी शीत युद्धात अमेरिकेचे साथीदार राहिले आहेत. काही पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचेही तुर्कीशी निकटवर्तीय संबंध राहिले आहेत. तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोआन. हे स्वत: ला इस्लामिक नेते सांगतात अन् काश्मीरचा मुद्दा सुद्धा इस्लामशी जोडून यावरुन ते पाकिस्तानच्या पाठीशी असल्याचं म्हणतात. त्यामुळे खरंतर तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या संबंधांचा मूळ धागाच धर्म आहे. तो म्हणजे इस्लाम.
पण त्याचवेळी अफगाणिस्तानही मुस्लीम राष्ट्र आहे. मग तरीही अफगाणिस्तानची संसद भारताने बांधून दिली आहे, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन समारंभाला गेले होते. तिथे आपण हॉस्पिटल बांधले आहे, India-Afghanistan Friendship डॅम सुद्धा बांधला आहे. त्यांच्या क्रिकेट टीमला लागणारे पैसे भारत देतो, कंदहारमध्ये स्टेडियम बांधायलाही भारत पैसे देतो आहे. रिलीफ फंड, धान्याची मदत असे खूप काय काय आपण केले आहे. आता अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार याची परतफेड करत आहे.
अफगाणिस्तानने भारताला पाठिंबा देत पहलगाममध्ये झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. भारताचं एक मिसाईल अफगाणिस्तानमध्ये पडले होते, असा दावा पाकिस्तानने केला होता. पण तालिबान सरकारने असे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एक ट्विट करून त्यांचे आभारही मानलेत. नुकतीच अफगाणिस्तानच्या प्रभारी परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी एस जयशंकर यांची चांगली चर्चा झाली.
याचं सोपं कारण म्हणजे पाकिस्तान मधील खैबर पखतूनवा राज्य. हे पाकिस्तानचं राज्य अफगाण सीमेवर आहे. या राज्यावर तालिबान स्वतःचा हक्क सांगतं. येथील पशतो समाज सांस्कृतिक दृष्ट्या स्वतःला अफगाणिस्तानचा भाग मानतो. पण इंग्रजांनी आखलेल्या डुराण लाईनमुळे हा भाग पाकिस्तानमध्ये आला आहे. इथल्या जनतेवर पाकिस्तानच्या सरकारकडून काही अन्याय झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत. पाकिस्तानचे इथे झालेले दुर्लक्ष आणि तालिबानचा प्रभाव यामुळे या भागात नेहमीच युद्धजन्य परिस्थिती असते.
यामुळे तालिबान पाकिस्तानला आपला शत्रू मानते. आता दुश्मन का दुश्मन म्हणजे अपना दोस्त, या नियमाने भारत अफगाणिस्तान नाते टिकून आहे. तालिबान सरकारने काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा दिला आहे. त्याबदल्यात भारत त्यांना खैबर पखतूनवा मुद्द्यावर पाठिंबा देतो. यासोबतच बलुचिस्तानची सीमा सुद्धा अफगाणशी लागूनच आहे. तिथूनच त्यांना शस्त्र पुरवठा केला जातो असा अंदाज आहे. अशा भुराजकीय परिस्थितीमध्ये भारताच्या राजकीय खेळीमुळे अफगाणिस्तान आणि तालिबानला आपल्या बाजूने ठेवायचे काम केले आहे.
अगदी महाभारतातील कंदहारपासून हे दोन्ही देश जोडले गेले आहेत. इंडस व्हॅली सिव्हीलायझेशन पासून अगदी आताच्या क्रिकेट प्रेमापर्यंत इथली लोकं सगळं सोबत सेलिब्रेट करतात. अफगाणी लोक बॉलिवूडचे मोठे चाहते आहेत. अमिताभच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी त्यांनी म्हणे एक दिवस युद्ध थांबवलं होतं. अफगाण सोबतच्या डिप्लोमसीमध्ये क्रिकेटचं प्रेम ही खूप मोठी भूमिका बजावत आहे. त्यामुळे सरकार सोबतच देशवासीयही जोडले जातात. भारतीय पर्यटक सुद्धा तिथल्या पाहुणचाराचं कौतुक करतानाचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.
आता या अंतरराष्ट्रीय संबंधाचा फायदा भारताला पाकिस्तान विरोधात कसा होईल हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.