NCP MLA Sangram Jagtap seen leading a Hindutva Morcha in Ahmednagar, reflecting his public image as a Hindu Rakshak. Sarkarnama
विश्लेषण

Sangram Jagtap: अजितदादांच्या आमदारानं हाती घेतला ‘हिंदुत्वाचा भगवा’ ; भाजपवासी होणार?

Ahilaynagar NCP MLA Sangram Jagtap Hindu Rakshak identity: अतिक्रमणे हटविताना रस्त्यात आडवी येणारी थडगी हटवा, अशी भूमिका त्यांनी घेतली. काही मंदिरेही त्याला अपवाद नव्हती. हिंदू संघटना त्यांना ‘हिंदूरक्षक’ म्हणून संबोधू लागले.

​ मुरलीधर कराळे

कोणी काय भूमिका घ्यावी, हा संबंधितांचा वैयक्तिक प्रश्न. समाजकारण करताना एकाच विषयाला वाहून घेणारे समाजसेवक आपण पाहतो. राजकारणामध्येही एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करून त्यावर ताकदीने बोलणारे नेते पाहतो. मतांची गोळाबेरीज करताना मात्र सर्वसमावेशक भूमिका घ्याव्या लागतात. प्रारंभी शिवसेनेने मराठी माणसांसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेत राजकारण केले.

आता पुन्हा मराठी माणसांसाठी लढणारी ठाकरेंची शिवसेना आपण पाहत आहोत. अशीच वेगळी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी स्वीकारली. हिंदुत्वाचा मुद्दा घेत ते आता प्रहार करू लागले आहेत. त्यावरूनच आगामी काळात धार्मिक अन् राजकीय ‘संग्राम’ घडू पाहत आहे.

अहिल्यानगर शहर मतदारसंघातून २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी विजयाची ‘हॅटट्रिक’ साधली. पहिल्या फेरीपासून आघाडी घेत त्यांना एक लाख १७ हजार ५५ मते मिळाली. विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना ७८ हजार २५५ मते मिळाली. जगताप गोटातून ‘पराजय’ हा शब्दच उच्चारला जात नव्हता.

विजयाची त्यांना खात्री होतीच; पण कळमकर यांना ७८ हजार मते मिळतील, अशी शक्यताही या गटातील नेत्यांना वाटत नव्हती; परंतु एका ठराविक समाजाची मते त्यांना मिळाल्याने मतांचा आकडा वाढला, असे विश्लेषण गटातील तज्ज्ञांनी केले. तेथेच हिंदुत्वाच्या भूमिकेची ठिणगी पडली अन् जगताप यांनी ‘हिंदुत्वाचा भगवा’ हाती घेतला.

मोर्चाद्वारे समर्थन

शहरातील अतिक्रमणे हटविताना रस्त्यात आडवी येणारी थडगी हटवा, अशी भूमिका त्यांनी घेतली. काही मंदिरेही त्याला अपवाद नव्हती. कर्जत, पाथर्डी तालुक्यांतील काही धार्मिक अतिक्रमणे हटविण्यात पुढाकार घेतला. त्यानंतर हिंदू संघटना त्यांना ‘हिंदूरक्षक’ म्हणून संबोधू लागले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्यावर ‘हिंदुत्वा’चा शिक्का बसला. हिंदू संघटनांनी जगताप यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले.

जिल्ह्यातील पाथर्डी, श्रीरामपूर, कर्जत आदी ठिकाणी हिंदुत्वाच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले. सिद्धटेक, मढी, जवखेडे खालसा, शिंगणापूर आदी ठिकाणी उदभवलेल्या धार्मिक वादात जगताप यांनी मध्यस्थी केली. अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील मोर्चातही ते सहभागी झाले. त्यांच्या विरोधात मुस्लिम समाज संघटनांनी मोर्चा काढला. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन देऊन ‘आमदार जगताप यांनी कट्टरवादी भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी,’ अशी मागणी करण्यात आली.

शिवसेेनेचे हिंदुत्व रुजलेले

हिंदुत्वाच्या मुद्द्याचा विचार करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाला स्पर्श करावाच लागेल. १९९० मध्ये ठाकरे यांनी भाजपसोबत ‘हिंदुत्व’ या मुद्द्यावर युती केली होती. महाराष्ट्रात राजकीय बंडानंतर एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे गटाकडून ‘गद्दार’ म्हणून हिणवले होते. त्या वेळी शिंदे गटाने ठाकरे गटाला उत्तर देताना ‘बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा पुढे नेतोय’, असं कारण दिलं होतं.

एकूणच राजकारणात हिंदुत्वाची भूमिका अनेक नेत्यांनी घेतल्याचे दिसून येते. अहिल्यानगर शहराला ही भूमिका तशी नवी नाही. यापूर्वी युती सरकारच्या काळात मंत्रिमंडळात असलेले आमदार अनिल राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. त्याआधी शिवसेनेचे नेते जगदीश भोसले यांच्या रूपाने अहिल्यानगर शहरात शिवसेनेचे आक्रमक हिंदुत्व सर्वप्रथम अवतरले. त्यांच्या आक्रमक हिंदुत्वाद्वारे शहरात शिवसेना रुजण्यास मदत झाली. मात्र, जगदीश भोसले यांची हत्या करण्यात आली.

त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले. त्यातून शिवसेना उपनेते अन् माजी मंत्री अनिल राठोड यांचे नेतृत्व उदयास आले. त्यांनी पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम केला. २५ वर्षे ते शहराचे आमदार होते. आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांनी दोन तपांहून अधिक काळ गाजविला. दंगलीतही हिंदुत्वाची भूमिका घेत शांततेसाठी प्रयत्न केले. आता आमदार जगताप यांच्या रुपाने पुन्हा याच भूमिकेचा आवाज शहरातच नव्हे, जिल्ह्यात घुमू लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही वक्तव्यावरून हा विषय राज्यभर चर्चेत आला इतकाच

पक्षाच्या बैठकीस दांडी

प्रत्येक मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक मुंबईला होते. उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करतात. आढावा घेतात. पंढरीच्या दिंड्या अहिल्यानगरमध्ये दाखल झाल्या, त्याच वेळी एका बैठकीला आमदार जगताप गेले नाहीत. तशी पूर्वकल्पना त्यांनी दादांनी दिल्याचा जगताप यांचा दावा आहे. विरोधकांनी मात्र जगताप यांच्या भूमिकेबाबत अजित पवार नाराज झाले असून, पवार संग्राम यांना समज देतील, या शक्यतेमुळेच जगताप गेले नाही, अशी चर्चा सुरू केली. त्यावर जगताप यांनी सडेतोड उत्तर देऊन हा विषय मिटला होता. नंतर अधिवेशनादरम्यान पुन्हा अजित पवार यांच्याशी जगताप यांची भेट झाली आणि या विषयाला खतपाणी मिळाले.

अजित पवार काय म्हणाले?

आमदार जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याची आवई अजितदादांच्या कानावर गेली. ते आता जगताप यांचे कान उपटतील, अशी आशा त्यांच्या विरोधकांना होती. तथापि, अजितदादांनी वेगळीच भूमिका घेतली. ‘आमदार जगताप यांच्याशी बोलून गैरसमज दूर करू,’ असे ते म्हणाले. त्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी जगताप यांच्या भूमिकेविषयी स्पष्टोक्ती केली. ते म्हणाले, ‘‘कोणताही पक्ष चालवित असताना जातीचा आणि नात्यागोत्यांचा विचार होऊ शकत नाही. सगळा समाज डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला काम करावे लागते. सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतो. पक्षाची स्थापना झाल्यापासून भूमिका तीच आहे. उद्याही तीच राहणार आहे. त्यात एखाद्या व्यक्तीने काही वक्तव्य केल्यास ती पक्षाची भूमिका नसते. ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते.’’ या वक्तव्यावरून पवारांनी जगताप यांना विशेष तीव्र विरोध केल्याचे दिसत नसल्याचे जगताप विरोधकांनी समजून चुकले.

ते भाजपवासी होणार?

भाजपने हिंदुत्वाची भूमिका पूर्वीपासून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून हिंदुत्वाची कडवी भूमिका घेतल्याने आमदार जगताप आता भाजपमध्ये जातील, अशी समाजमाध्यमांवर चर्चा रंगू लागली. त्याला पूर्णविराम देताना जगताप यांनी चोख उत्तर दिले. ‘कोणी काहीही बोलले, तरी आपली भूमिका तीच राहील,’ असे त्यांनी निक्षून सांगितले. तसेही शहरातील भाजपचे बरेचसे नेते, कार्यकर्ते जगताप यांना मानणारे आहेत. महायुतीत एकत्र निवडणुका लढवित आहेत. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये गेले काय, अन् न गेले काय, काय फरक पडणार, असे मतही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.

आता पुढे काय?

राज्यांतील अन्य महापालिकांप्रमाणेच अहिल्यानगर महापालिकेवर सध्या प्रशासकराज आहे. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान निवडणुका होतील. सध्या मतदारांची जुळवाजुळव इच्छुकांतून होत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेले अनेक नगरसेवक आमदार जगताप यांना मानणारे होते. शिवसेनेचे महापौर होते, तरीही बरेचसे निर्णय जगताप यांना विश्वासात घेऊन होत होते, हे सर्वश्रुत आहे. महापालिकेला मोठा निधी मिळवून देण्यात जगताप यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. शहराला बाराशे कोटींचा निधी आणून रस्ते सिमेंटचे झाले.

वर्षानुवर्षे असलेले खड्डे गायब झाले. भूमिगत गटारे करून थोड्याशा पावसाने साचणाऱ्या पाण्यावर तोडगा काढला. शहरात भरपूर पाणी मिळावे, उपनगरांना सुविधा मिळाव्यात म्हणून फेज-२ मधून मोठा निधी खर्च करून मुळा धरणापासून दुसरी पाइपलाईन आणली. तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने उड्डाणपूल आणून नगर-संभाजीनगर महामार्गावर नगर परिसरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविला. शहरातील अतिक्रमणे हटविली. गल्लीबोळांतील रस्ते गुळगुळीत झाले. त्यामुळे नगरकर जगताप यांच्या कार्यावर खूष झाले. त्याचाच परिणाम २०२४ च्या विधानसभेत निवडणुकीत दणदणीत विजय मिळविता आला.

कामे करणाऱ्यांनाच महत्त्व

आपल्या प्रभागात कामे व्हावीत, पुन्हा आपल्याला नगरसेवकपदाची संधी मिळावी, यासाठी सर्वच पक्षातील नगरसेवकांनी जगताप यांच्याशी सलगी करून आपले कामांचे इप्सित साध्य केले. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीतही हाच कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. कोण कोणत्या पक्षात जातो, याला काहीच अर्थ राहणार नाही, तर शहरात कामे कोण करणार याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

अहिल्यानगर शहराकडे राज्याचे कायमच लक्ष असते. महापौर, आमदार कोण याची बहुतेकांना उत्सुकता असते. अहिल्यानगर शहर ‘आर्थिक हब’ नसले, तरी राजकीय विषय राज्य पातळीवर गाजतात. त्यामुळेच आगामी निवडणुकीत जगताप यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला नगरकर कसे स्वीकारतात, हे आगामी काळच ठरविणार आहे. विरोधकांकडून नाराज असलेल्या समाजाला पुढे करून राजकारण होईल, यात शंका नाही. पण त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना त्यांना कशी उत्तरे देणार? सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कोण जगताप यांच्या भूमिकेविरोधात षड्डू ठोकणार, हे लवकरच समजेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT