Akshay Shinde Encounter Sarkarnama
विश्लेषण

Akshay Shinde Encounter : बंदुकीला हात लावून तर पाहा, पोलिस तुम्हाला आडवेच करतील; मग आरोपी शिंदेला सूट कशी?

अय्यूब कादरी

Akshay Shinde Encounter Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर हा सरकारचा बनाव आहे, यातील अन्य आरोपींना वाचवण्यासाठी शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे, असा आरोप विरोधक करू लागले आहेत.

शिंदेच्या हातात बेड्या होत्या का, त्याच्या तोंडवार कपडा घालण्यात आला होता का, हे पोलिसांनी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही केली आहे. या प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरत असताना सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनीही या एन्काऊंटरवर संशय व्यक्त केला आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, याबाबत विरोधकांचेही दुमत नाही. मात्र कोणाला तरी वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर करण्यात आला, असा आरोप होऊ लागला आहे. आरोपी शिंदेच्या तोंडावर बुरखा होता, हातात बेड्या होत्या, मग तो बंदूक हिसकावून गोळ्या कसा झाडू शकतो? असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.

कोणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळे घडवून आणले आहे, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. कोणाला तरी वाचवण्यासाठी हे घडवले आहे, हा विरोधकांच्या टीकेतील समान मुद्दा आहे. त्यामुळे गृह मंत्रालय आणि सरकार संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. पोलिसाची बंदूक हिसकावणे आणि त्यातून पोलिसांवर गोळीबार करणे इतके सोपे नसते, असे मुंबई पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका सहायक पोलिस आयुक्तांनी सांगितले. आरोपी शिंदेने झाडलेली गोळी ज्या अधिकाऱ्याला लागली आहे, त्या अधिकाऱ्याने काय जबाब दिला आहे, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

कोणताही गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावा हा अत्यंत महत्वाचा असतो. आरोपी शिंदेचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा अन्य आरोपींच्या खटल्यावर काय परिणाम होतो, हे पाहावे लागणार आहे. आपली बंदूक एखाद्याने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर पोलिस अधिकारी किंवा पोलिस कर्मचारी त्याला काही सेकंदांतच लाथा घालून आडवा करतील, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ठाणे (Thane) अथवा कारागृहातून नेत असताना त्याच्या हातात बेड्या असतात. कधीकधी दोरीने त्याचे हात बांधलेले असतात.

अशा परिस्थितीत आरोपी शिंदे याने पोलिसाच्या कमरेचे रिव्हॉल्व्हर कसे हिसकावले असेल? रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यातून तीन राऊंड फायरिंग होईपर्यंत वाहनातील पोलिस शांत कसे बसले? पोलिसाच्या बंदुकीला कुणी हात लावायचा प्रयत्न केला तरी पोलिस त्याला झोडपून काढतात. मग आरोपीने रिव्हॉल्व्हर हिसकावून गौळीबार करेपर्यंत पोलिस शांत बसले असतील, हे पटत नाही, असेही त्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपींचा एन्काऊंटर केल्यास अत्याचाराची प्रकरणे थांबतील, असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. काही वर्षांपूर्वी अशा प्रकरणातील चार आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. तरीही महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे काही कमी झालेली नाहीत. लोकांचा सरकारवरील राग कमी करण्यासाठी असे प्रकार घडवून आणले जातात. त्याला समाजातूनही पाठिंबा मिळतो. एकदाचा न्याय मिळाला, अशी काही लोकांची धारणा बनते. मात्र लोकशाही व्यवस्थेत न्याय न्यायालयांतून मिळाला पाहिजे.

पोलिस (Police) न्याय करायला लागले आणि लोकांनीही तशी अपेक्षा करायला सुरुवात केली तर समाजात अराजक माजेल. शिंदेचा एन्काऊंटर अन्य आरोपींना वाचवण्यासाठी केला का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. ज्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला, त्या शाळेचे विश्वस्त भाजपशी संबंधित आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिका संशयास्पद होती. फिर्याद देण्यासाठी आलेल्या पीडित मुलींच्या पालकांना पोलिसांनी 12 तास पोलिस ठाण्यात बसवून घेतले होते.

या प्रकरणी काही पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करणाऱ्या पोलिसांना बदनामी आणि नंतर निलंबन, असा दुहेरी त्रास सहन करावा लागतो. बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरवरून पोलिस पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. आपल्या बंदुकीला हात लावणाऱ्या आरोपी शिंदेला पोलिसांनी रोखले कसे नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT