Vikasit Bharat Sankalp Yatra. Sarkarnama
विश्लेषण

Modi Sarkar : ‘मोदी सरकार’ की ‘भारत सरकार’.. अरे भाई कहना क्या चाहते हो...?

प्रसन्न जकाते

Lok Sabha Election 2024 : ‘हम जहां खड़े होते हैं…लाइन वहीं से शुरू होती है…’ ऐंशीच्या दशकात गाजलेल्या ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चनच्या कालिया चित्रपटातील हा संवाद आठवतोय का? आपण कुणालाही जुमानत नाही, आपण करू तोच कायदा आणि आपण लावू तीच सीस्टिम असा संदेशच कालिया चित्रपटातील नायकाने खलनायकाला दिला. सध्या असाच काहीसा संदेश दिल्लीतील मोदी-शाह जोडी राजकारणातील रुपेरी पडद्यावरील त्यांच्या दृष्टीने खलनायक असलेल्यांना देत आहे.

निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयातील नियुक्ती, लोकसभेतील कामकाज आणि विरोधकांवर सीबीआय आणि ईडीकडून होणाऱ्या कारवाईमधून तरी सध्या तेच प्रतीत होत आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर भाजपकडून केला जात असल्याचा आरोप आता नवा नाही. अशातच विदर्भात घडलेल्या दोन घटनांमुळे हाच मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.

‘मोदी सरकार’ असे ठळक अक्षरात लिहिलेले आणि नरेंद्र मोदी यांचा भला मोठा फोटो असलेले विकसित भारत संकल्प यात्रेचे रथ सध्या विदर्भात सर्वत्र फिरत आहेत. अकोला जिल्ह्यातील रिधोरा आणि आता गडचिरोलीतील अनखोडा गावात सरकारी योजनांचा प्रचार-प्रसार करणारा हा रथ रोखण्यात आला. मुद्दा एकच होता विकसित भारत यात्रा नेमकी कुणाची ‘भारत सरकार’ची की ‘मोदी सरकार’ची.

‘मोदी सरकार’ला विरोध..

अकोल्यातील रिधोरा गावात रोखण्यात आलेल्या रथामागे वंचित बहुजन आघाडीचे षड्यंत्र होते, असा आरोप भाजपने केला. गडचिरोलीतील गोंधळामागे काँग्रेस असावी, असा एक संशय आहे. असे असले तरी या दोन्ही प्रकारांमुळे उपस्थित झालेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. रथ अडविणाऱ्यांना ‘भारत सरकार’ला विरोध केलेलाच नाही. त्यांचा विरोध ‘मोदी सरकार’ या शब्दाला आहे. हा विरोध तसे पाहिल्यास चुकीचाही नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माहिती अधिकारातून झाले उघड..

काही महिन्यांपूर्वी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने पंतप्रधान कार्यालय आणि केंद्र सरकारी यंत्रणांकडे ‘मोदी सरकार’बाबत विचारणा करणारी ‘आरटीआय’ दाखल केली होती. सरकारी यंत्रणांनी त्याला उत्तर देताना ‘मोदी सरकार’ नावाचा प्रकार अस्तित्वातच नसल्याचे उत्तर दिले होते. ‘भारत सरकार’ आहे असेही या उत्तरात नमूद होते. लेखी स्वरूपात उत्तर देणारी हिच सरकारी यंत्रणा आता देशभरात ‘मोदी सरकार’चे गुणगान गात आहे.

इव्हेंट मॅनेजमेंट..

यात्रेसोबत असणारे सरकारी अधिकारी, कर्मचारी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल माहिती देत आहेत, यात कोणतीही शंका नाही. परंतु विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने ठिकठिकाणी भाजपकडून ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ केले जात आहे, यात अजिबातच शंका नाही. यात्रा आलेल्या ठिकाणी टेबलखुर्च्या टाकायच्या आणि भाषणे ठोकायची, असा सपाटाच भाजपच्या नेतेमंडळींनी लावला आहे.

हम आपके है कौंन?

अशा ‘इव्हेंट’चे ‘मॅनेजमेंट’करताना भाजपवाले इतर खासदार, आमदारांना टाळत आहेत, असेही नाही. आपल्यादृष्टीने सोयीच्या असलेल्या खासदार, आमदारांना पुष्पहार आणि यथोचित सन्मान देत ‘आ गले लग जा’ भाजपकडून केले जात आहे. त्यात मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा काँग्रेसचा लोकप्रतिनिधी असेल तर त्याच्याबाबतीत मात्र ‘हम आपके है कौंन?’ची भूमिका घेतली जात आहे. अशात खरी अडचण होत आहे ती सरकारी यंत्रणेची.

सरकारी यंत्रणेसाठी लोकप्रतिनिधी तो लोकप्रतिनीधीच. मग त्याच्या हाती ‘कमळ’ असो की ‘घड्याळ’, ‘धनुष्यबाण’ असो की ‘मशाल’ अथवा त्यांचा ‘पंजा’ रिकामा, त्यांना तर सर्वांना समान सन्मान द्यावाच लागतो. परंतु विकसित भारत संकल्प यात्रेत असा शिष्टाचारही जरा कमीच पाळला जात आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्प यात्रा कुणाची सरकारची की एका राजकीय पक्षाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच सरकारी अधिकारी, कर्मचारीही आपल्या संबोधनातून ‘भारत सरकार’ ऐवजी ‘मोदी सरकार’ असाच उल्लेख करीत असल्याने सर्वसामान्य जनता तर त्यांना विचारणारच की ‘अरे भाई कहना क्या चाहते हो...

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT