Priyanka, Rahul and Sonia Gandhi
Priyanka, Rahul and Sonia Gandhi  File Photo
विश्लेषण

मोदींच्या कामगिरीपुढे थकलेल्या काॅंग्रेसला आता केजरीवालांनीही शिंगावर घेऊन आपटले!

ऋषीकेश नळगुणे

कॉंग्रेसला (Congress) नियोजनबद्ध पद्धतीने संपवण्यात आम आदमी पक्षही (Aam Aadmi Party) आता स्पर्धेत उतरला आहे, असं म्हटल्यास अजिबात वावगं ठरणार नाही. कारण काल लागलेले निकाल. या निकालानंतर एक चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे अरविंद केजरीवाल आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) टक्कर देणार. मात्र या चर्चा जरा लवकर सुरु झाल्या आहेत असं वैयक्तिक मला वाटतं. कारण मुळात केजरीवाल (Arvind Kejriwal) भाजपच्या विरोधात मैदानात नव्हतेच.

होय. आपण ज्याप्रमाणे शाळेतील परिक्षांवेळी प्रश्नपत्रिकेतील सोपे प्रश्न आधी सोडवतो आणि अवघड प्रश्नांना सावकाश हात घालतो अगदी त्या प्रमाणेच केजरीवालांची रणनिती आपल्याला दिसून येते. २०१४ साली अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या मोदींविरोधात निवडणूक लढवली. त्यात त्यांचा तब्बल ३.५ लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. त्याशिवाय भाजपचाही मोठा विजय या निवडणुकीत झाला. तेव्हाच केजरीवाल यांच्या लक्षात आलं की हा अवघड प्रश्न आपण नंतर सोडवायला घेवू. पहिले सोपे प्रश्न संपवू.

सहाजिकच केजरीवाल यांच्यासाठी सोपा प्रश्न होता तो कॉंग्रेसचे राज्य. यात त्यांनी पहिल्यांदा घाव घातला तो थेट कॉंग्रेसच्या दिल्लीवरच. त्यांनी शीला दिक्षीतांकडून दिल्ली काबिज केली. त्यानंतर त्यांनी नाही म्हणायला इतर राज्यात निवडणुका लढवल्या. पण त्यात त्यांना फारसं यश आलं नाही. त्यानंतर २०१७ साली 'आप'ने दुसरा सोपा प्रश्न अर्थात दुसरं राज्य निवडला ते पंजाब. कारण इथे आधीच आपचे ४ खासदार होते शिवाय भाजप असून नसल्यासारखं होतं आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामुळे कॉंग्रेसचा गड होता.

केजरीवाल यांना कॅप्टन यांच्या करिश्म्यामुळे २०१७ ला जास्त ताकद दाखवता आली नाही. पण २० जागा जिंकत आम आदमी पक्षाने आपल्या आशा मात्र पल्लवित केल्या. पुढे ५ वर्ष आम आदमी पक्षाने सातत्याने तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळवलं, याशिवाय राजधानी चंदिगढ महापालिकेमध्ये देखील नंबर एकचा पक्ष बनला आणि आता थेट पंजाबच्या सत्तेवरचं मजल मारली. केजरीवाल यांच्यासाठी पंजाबचा पेपर सोपा असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचं दिल्लीतील काम आणि सर्व वर्गासाठी असलेल्या सार्वत्रिक योजना.

केजरीवाल यांच्यासाठी कॉंग्रेसविरोधी वातावरण हा आणखी एक मुद्दा कामाचा ठरला. त्यांनी पक्ष स्थापन केला तोच मुळात या कॉंग्रेसच्या विरोधी वातावरणात आणि असंतोषाला पर्याय म्हणून. त्याच वातावरणाचा फायदा त्यांना दिल्ली आणि पंजाबमध्ये झालेला दिसतो आणि असे वातावरण तयार करण्यात त्यांना भाजपनेही मोठी साथ दिली. त्यामुळे कॉंग्रेस संपवण्यासाठी किंवा कॉंग्रेस मुक्त भारताचे जे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पाहिलं त्याला अरविंद केजरीवाल यांनी अगदी योग्य साथ दिली असं म्हणावं लागेल.

एकूणच सध्या कॉंग्रेसची जागा बळकावण्यासाठी 'आप'पासून ते तृणमूल, राष्ट्रवादी कॉंग्रेस असे सगळेजण छान झगडत आहेत. कॉंग्रेसला पर्याय देत आहेत. कॉंग्रेसची जागा घेवून यापूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर कॉंग्रेस, वर सांगितलेला तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बिजू जनता दल असे चिक्कार पक्ष उभे राहिले आणि ताकदवान देखील झाले. कॉंग्रेसला ठिकठिकाणी वेगवेगळे पर्याय उभे राहिले. ना की भाजपला. भाजप आपल्याजागी अढळ आहे. मोदी आपल्याजागी अधिक सुखरूप आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT