कोमल जाधव
Ramdas Kadam Allegations : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू दोन दिवस झाले होते तरी त्यांचा मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता, असा दावा केला. बाळासाहेबांच्या बोटाचे ठसे त्यांच्या मृत्यूनंतर घेतल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाकरेंचे विश्वासू नेते, आमदार अनिल परब यांनी त्यांना प्रत्युत्तर देत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले. मात्र, कदम यांच्या आरोपाच्या टायमिंगची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
रामदास कदम यांनी केलेला आरोप हा अतिशय गंभीर मानला जातोय. पण, उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद, आमदारकी कदमांना दिली होती. तेव्हा साधा ब्र देखील न उच्चारणाऱ्या कदमांनी आत्ताच आरोप का केला? याची देखील चर्चा आहे. मात्र, कदमांच्या या आरोपामागे मोठं राजकारण दडलंय.
सोलापूर जिल्हा, मराठवाडा अतिवृष्टीनं पुराच्या गर्तेत अडकला. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत, गुरंढोरं पुराच्या पाण्यात मृत पावली. हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गाने हिरावले आहे. कर्जमाफी आणि पण आता मुद्दा येतो मग या पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्तांच्या मदतीचा. एकीकडे फडणवीस, शिंदे, अजितदादा शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगतात दुसरीकडे याच सरकारमध्ये सत्तेत असलेले अजितदादा ज्यांच्याकडे वित्त खाते आहे, ते सरळसरळ म्हणतात बाकी कशाचंही सोंग घेता येतं पण पैशाचं नाही. आणि हाच मुद्दा जालन्यातल्या एका सभेत बच्चू कडूंनीही उपस्थित केला होता. त्यामुळे नुकसानग्रस्त, पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सरकारनं सढळ हातानं मदत केली पाहिजे. जुलै ते ऑगस्टमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलंय. पण, सप्टेंबर महिन्यासाठी अजून काहीच नाही. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय.
तरी, विरोधकांकडून सरकारला घेरलं जात असताना रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूची चर्चा उकरून काढल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा एक प्रकार असल्याचीही चर्चा आहे.
दोन आठवड्यांवर दिवाळी आली आहे. दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात होणार आहे. म्हणजे खुद्द भाजपाचे बडे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक पेक्षा खरी निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्याचं म्हटले. त्यामुळे दिवाळीनंतर पहिली निवडणूक झेडपीची होईल, नोव्हेंबर शेवटी झेडपी, डिसेंबर शेवटी नगरपालिका आणि जानेवारी शेवटीला महापालिका निवडणूक होईल असा अंदाज चंद्रकांत पाटलांनी वर्तवलाय.
त्यामुळे या महिनाअखेरीस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीनं आचारसंहिता लागेल. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूचे आणि मृत्युपत्राचे प्रकरण उकरून काढल्याचे बोलले जाते आहे. तसा आरोप खुद्द ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांनीही केला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ५ जुलैला पहिल्यांदाच मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले. त्यानंतर आता तीन महिन्यांनंतर दोघांमध्ये किमान तीनदा भेटी झाल्या आहेत. तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अधिकृतरित्या अजूनही ठाकरेंच्या युतीची घोषणा झालेली नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी, आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. आम्ही एकत्र आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, अशा शब्दात या चर्चांना दुजोरा दिला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास ती युती महायुतीला जड जाईल, याची कुणकुण महायुतीमधील नेत्यांना आहे. कारण, मुंबईबाबत सांगायचे झाले तर मुंबई महापालिका=ठाकरे असे समीकरण आहे. मागील २५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवर विजयी झेंडा भडकवणाऱ्या शिवसेनेसोबत २० वर्षे तर भाजप सत्तेत वाटेकरी होती. पण यंदा मुंबई महापालिका निवडणूक वेगळी असणारे. शिवसेनेत फूट पडली. भाजप-शिवसेनेत ताटातूट झाली आहे. त्यामुळे आता भाजपला मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवायचाय. त्यासाठी खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसुद्धा मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. मागील वेळी भाजपाला तब्बल ८२ जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी सर्वात मोठा पक्ष ठरत पालिकेची सत्ता मिळण्याचे ध्येय भाजप नेत्यांचे आहे.
मुंबईतील आमदारांची संख्या पाहता ही मुंबई महापालिकेची निवडणूक ही महायुतीला सोपी नाही. विशेष करून एकनाथ शिंदेंना विजय मिळवणे अवघड दिसत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी भाजप- 15 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १० जागांवर विजय मिळवला. तर एकनाथ शिंदेंना ६ जागा मिळाल्या. त्यामुळे मुंबई महापालिकेत मानाचं पान मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंना स्वत:चं महत्व सिद्ध करायचं असल्यास महापालिकेतही चांगल्या संख्येनं नगरसेवक आणावे लागणार आहेत. तर आणि तरच भाजप शिवसेनेला विचारेल अशीही चर्चा आहे. शिंदेंच्या मार्गात उद्धव ठाकरे हेच सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे रामदास कदमांच्या आरोपाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना विचलित करण्याचे प्रयत्न असल्याचेही दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.