Shashank Rao Raj-Uddhav Thackeray  sarkarnama
विश्लेषण

BEST Election Result : बेस्ट पतपेढीचा निवडणुकीत ठाकरे बंधुंचा पराभव, मुंबई महापालिकेवर काय परिणाम?

Shashank Rao Raj-Uddhav Thackeray Panels Defeated BMC Election : बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या पॅनलला भोपळा देखील फोडता आला नाही.त्यामुळे ठाकरे ब्रँड धोक्यात आल्याची चर्चा आहे. या निवडणुकीचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर किती परिणाम होईल याची देखील चर्चा सुरू झाली आहे.

Roshan More

BMC Election : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती झाली होती. उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून दोन्ही पक्ष एकत्र आले. ठाकरे बंधुंची ही पहिलीच युती म्हणून याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, 21 जागां पैकी एकही जागेवर या युतीला विजय मिळवता आला नाही.

बेस्टच्या निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे ठाकरे ब्रँड चालला नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक होऊनही ठाकरेंचा पराभव झाला, अशी टीका भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मंत्री आशिष शेलार यांनी तर घोषणाच करून टाकली की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड हे स्टार प्रचारक असतील.

बेस्टमध्ये झालेल्या पराभवामुळे महापालिका निवडणुकीत देखील ठाकरे ब्रँड चालणार नाही, असे भाजप नेते स्पष्ट बोलत आहेत. ब्रँडचा बँड वाजवला, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. त्यामुळे खरंच महापालिका निवडणुकीत बेस्टच्या निवडणुकीचा परिणाम दिसून येईल का? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

वास्तविक पाहता बेस्टच्या निवडणुकीत 15 हजार मतदार होते. त्यातील बहुसंख्य हे मराठी आहेत. निवडणुकीत प्रत्यक्ष 83 टक्के मतदान झाले. 12 हजार 656 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिने ही संख्या पाहिली तर फार मोठी नाही. त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठण्याची घाई नको.

'बेस्ट'चा परिणाम महापालिकेवर नाही

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप युती तब्बल 25 वर्ष सत्तेत होती. मात्र, या काळात देखील शशांक राव यांचे वडील शरद राव यांच्या कामगार संघटना शक्तिशाली होती. कामगार संघटनांच्या निवडणुकीत त्यांना यश मिळत होते. कामगारांमध्ये त्यांचा दबदबा होता. कामगार संघटनेतील मराठी कामगार हे शरद रावांना पाठींबा देत असले तरी महापालिका निवडणुकीत मात्र ते भाजप आणि शिवसेनेच्या युतीलाच मतदान करत असल्याचे दिसून येते. शरद राव आणि शशांक राव यांना देखील विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळाले नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे 'बेस्ट'निवडणुकीचा परिणाम महापालिकेवर होईल, असे म्हणणे योग्य नाही.

महायुतीचा देखील पराभव

ठाकरे बंधुंनी महापालिका निवडणूक एकत्र लढूनही त्यांचा पराभव झाला तसा भाजप आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि नारायण राणे, एकनाथ शिंदेंचा पाठींबा असलेल्या महायुतीचा समृद्धी पॅनलचा देखील झाला. त्यांना देखील केवळ सातच जागा जिंकता आल्या. त्यामुळे ठाकरे बंधूंसोबत भाजपचा देखील पराभव झाला आहे. बेस्टमधील विजय हा शशांक राव यांच्या रणनीतीचा विजय आहे. शशांक राव भाजपमध्ये आहेत मात्र महायुतीच्या पॅनेलसोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढत त्यांनी विजय मिळवला आहे.

9 वर्षांच्या कारभाराचा फटका

गेल्या नऊ वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कामगार सेनेचे वर्चस्व बेस्टच्या पतपेढीमध्ये होते. मात्र, या नऊ वर्षांच्या काळाता कामागरांच्या हिताचे रक्षण त्यांना करता आले नसल्याची टीका शशांक राव यांनी केली होती. प्रचारात त्यांनी तोच मुद्दा लावून धरला होता. मागील 9 वर्षांच्या काळात शशांक राव हे कामगारांच्या हितासाठी आपल्या संघटनेकडून रस्त्यावरची लढाई लढत होते. त्यामुळे मागील नऊ वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंच्या बेस्टमधील कामगार संघटनेच्या खालवलेल्या कामागिरीचा फटका निवडणुकीत बसला तसेच बेस्टमध्ये जुन्या लोकांना बाजुला करून ते नवे नेतृत्व देऊ शकले नसल्याचे देखील उद्धव ठाकरेंना तोटा झाल्याचे दिसते.

...तर ठाकरे बंधूंसाठी धोक्याची घंटा

मराठीच्या मुद्यावर एकत्र आलो म्हणजे यश मिळेल, या समजुतीला पहिला धक्का बेस्टच्या निवडणुकीत लागला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना या निवडणुकीतून धडा घ्यावा लागेल. उद्धव ठाकरेंची बेस्टमध्ये ताकद आहे आणि ते मागली नऊ वर्ष सत्तेत देखील होते. मात्र, मनसेची येथे काहीच ताकद नाही. त्यांच्या वाट्याला देखील केवळ तीन जागा आल्या होत्या. मात्र, मैदानावरची लढाई ही किती अवघड आहे याचा अंदाज या निवडणुकीवरून ठाकरे बंधुंना आला असेल. भावनिक मुद्यांसह मैदानावरची लढाई पूर्ण ताकदीने लढताना योग्य रणनीती आखली तर यश मिळेल.त्यामुळे या निवडणुकीतून धडा घेतला नाही तर ती ठाकरे ब्रँडसाठी धोक्याची घंटा ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT