“Tejashwi Yadav addressing supporters during Bihar Adhikar Yatra after Rahul Gandhi’s voter rights march.” Sarkarnama
विश्लेषण

Bihar Assembly Election : राहुल गांधींच्या ‘मतचोरी’ला तेजस्वी यादव यांच्याकडून कात्री; 15 दिवसांतच वेगळा अजेंडा…

Tejashwi Yadav’s Bihar Adhikar Yatra: Key Highlights : राहुल गांधी यांच्या यात्रेला व्होटर अधिकार असे नाव देण्यात आले होते. तेजस्वी यादव यांनी यातील व्होटर हा शब्द हटवून त्याजागी बिहार हा शब्द घालत बिहार अधिकार यात्रा काढली आहे.

Rajanand More

Bihar alliance politics : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाकडून कंबर कसण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मतदारयादी पुनर्पडताळणी मोहीम हाती घेतल्यानंतर महाआघाडीच्या हाती आयते कोलित मिळाले. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये एकत्रितपणे व्होटर अधिकार यात्रा काढली. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. पण आता 15 दिवसांतच तेजस्वी यांचा अजेंडा बदलला आहे.

तेजस्वी यादव यांची बिहार अधिकार यात्रा आजपासून सुरू झाली. पुढील पाच दिवस ही यात्रा बिहारमधील 10 जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. जहानाबाद येथून सुरू झालेली ही यात्रा 20 सप्टेंबरला वैशाली येथे संपणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, त्यावरून राजकीय वर्तूळात चर्चांना उधाणही आले आहे. त्याचे कारण या यात्रेच्या नावात दडले आहे.

राहुल गांधी यांच्या यात्रेला व्होटर अधिकार असे नाव देण्यात आले होते. तेजस्वी यादव यांनी यातील व्होटर हा शब्द हटवून त्याजागी बिहार हा शब्द घालत बिहार अधिकार यात्रा काढली आहे. तसेच ही यात्रा फक्त राष्ट्रीय जनता दलाची असणार आहे. त्यामध्ये काँग्रेस किंवा इतर मित्रपक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे तेजस्वी यादव यांनी व्होटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या बरोबरीने सहभाग घेतला होता. इतर मित्रपक्षांचे नेतेही सक्रीय होते.

राहुल गांधी यांनी व्होटर अधिकार यात्रेदरम्यान तेजस्वी यादव यांना बिहारचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याबाबत काहीच विधान केले नव्हते. दुसरीकडे तेजस्वी यांनी मात्र राहुल यांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीचे स्वप्न दाखवले होते. हीच सल राष्ट्रीय जनता दलाच्या मनात असल्याची चर्चा आहे. त्यानंतर बिहारमधील सर्व 243 जागांवर उमेदवार उभे करण्याबाबतची सूचक विधाने तेजस्वी यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्या या यात्रेला महत्व प्राप्त झाले आहे.

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये फारसे सख्य नसल्याचेही यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहे. जागावाटपामध्ये काँग्रेसकडून 70 जागांसह उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याचे बोलले जात आहे. त्यावरून तेजस्वी यादव नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून काँग्रेसवर दबाव वाढविण्याची रणनीती आखण्यात आल्याचे दिसते. आपल्या चेहऱ्यावर संपूर्ण बिहारमध्ये निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसला राजी करण्याचे त्यांचे धोरण दिसते. व्होटर शब्द हटवून त्यांनी राहुल गांधींच्या रणनीतीला बाजूला सारल्याचे दिसते.

व्होटर अधिकार यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसकडून प्रामुख्याने राहुल गांधी यांनाच प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार, संविधान आदी मुद्दे प्रकर्षाने पुढे करण्यात आले. पण बिहारमधील विविध समस्यांवर या यात्रेत प्रकाशझोत टाकण्यात आला नाही. तेजस्वी यादव यांच्या बिहार अधिकार यात्रेच्या माध्यमातून प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधले जाणार असल्याचे नेत्यांकडून सांगितले जात आहे.

बिहारमधील जनतेच्या भावनांना हात घालण्याचे काम तेजस्वी यादव या यात्रेतून करतील. आगामी विधानसभा निवडणूकही त्याच मुद्द्यांवर लढण्याची त्यांची ही रणनीती दिसते. काँग्रेसच्या अजेंड्यावर न चालता आपला स्वतंत्र अजेंडा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. पण दुसरीकडे काँग्रेसची चिंता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT