तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे दोन नेत्यांचा भाजप प्रवेश झाला आहे.
रत्नागिरीत या प्रवेशामुळे उदय सामंत यांना थेट आव्हान मिळाले आहे.
सिंधुदुर्गात विशाल परब यांच्या प्रवेशामुळे नारायण राणेंना भाजपकडून दबावाचा संकेत मिळाला आहे.
Kokan Politics News : तळ कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा भाजप प्रवेश नुतकाच झाला. या प्रवेशामुळे रत्नागिरीत उदय सामंत यांना भाजपने अंगावर घेतलं आहे. तर सिंधुदुर्गात विशाल परब यांच्या प्रवेशाने भाजपने एकाच वेळी दोन संकेत दिले आहेत. एक तर कुरघोडी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात ताकद वाढवली आहे. दुसरे म्हणजे स्वपक्षातील तगडे नेतृत्व खासदार नारायण राणे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
तळ कोकणात आगामी स्थानिकची जोरदार मोर्चेबांधणी होताना दिसत आहे. पण भाजपच्या या मोर्चे बांधणीत 'हा ही माझा, तो ही माझा आणि कट्टर विरोधकही माझाच' असचं काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र भाजपच्या या भूमिकेमुळे सिंधुदुर्गमधील राजकारण वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. येथे परब यांच्या स्वगृही परतण्याने राणेंचा गेम करण्याचा डाव भाजपनेच आखल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तर शिवसेनेलाही थेट इशारा दिला जात आहे.
सिंधुदुर्गमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी थेट भाजप फोडण्याचाच इशारा दिला असून अनेकांचे प्रवेश सध्या जिल्ह्यात सुरू आहेत. हा वाद इतका वाढला की भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर इथला वाद निवळेल अशी शक्यता होती. पण अद्याप वातावरण शांत झालेले नाही. यातच भाजपने सावंतवाडीवर दावा सांगणारा नेताच आपल्या बाजूने पुन्हा घेतला आहे. त्यामुळे हा पक्ष प्रवेश शिवसेनेलाही थेट इशाराच असल्याचे बोलले जात आहे.
नुकताच राणेंचे विरोधक असणाऱ्या पण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जवळ असणाऱ्या परब यांचा मुंबईत प्रवेश झाला. फक्त प्रवेशच झाला नाही तर चव्हाण यांनी पक्ष वाढीसाठी आपण सर्व ते मार्ग अवलंबू असे सांगितले आहे. तसेच परब यांना ताकद देवू असेही आश्वासन दिले आहे. त्यांचे हे आश्वासन असो किंवा परब यांचा पक्षप्रवेश असो, तो एका आर्थी खासदार राणेंना डिवचणारे आहे. कारण भाजपच काय तर शिवसेनेत कोणाचा प्रवेश करून घ्यायचा असेल तर किमान तळ कोकणात मला विचारावं लागेल, त्या शिवाय तो प्रवेश होणार नाही असा दम राणेंनी काही महिन्यांच्या आधीच चव्हाण यांना भरला होता.
पण आता राणेंच्या दम भरवणाऱ्या वक्तव्याची हवाच नव नियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढली टाकली आहे. त्यांनी विधानसभेला बंडखोरी करणाऱ्या परब यांना पुन्हा पक्षात घेतले. पण यावेळी त्या प्रवेशाला राणेंपैकी कोणीच तेथे उपस्थित नव्हते. त्या प्रवेशाच्या आधी रत्नागिरीतील प्रवेशावेळी नितेश राणे हजर होते. मात्र त्यांनी परब यांच्या प्रवेशावेळी काढता पाय घेतल्याची चर्चा आहे.
यावेळी चव्हाण यांनी भाजप पक्षापेक्षा कोणी व्यक्ती किंवा आपण स्वत: मोठे नाही. पक्षाच्या विस्तारासाठी आपण कोणतीही किंमत चुकवायला तयार असल्याचाच संदेश यानिमित्ताने दिला आहे. तसेच या नेत्याच्या प्रवेशाने राणेंच्या वर्चस्वाला ब्रेक लावण्याचे काम भाजप करताना दिसत असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा रंगली आहे. मात्र एका प्रवेशाने राणेंच्या वर्चस्वला तडा जाईल असे येथे म्हणता येणार नाही. एकाच राणे कुटुंबात नारायण राणे खासदार, नितेश राणे मंत्री आणि निलेश राणे आमदार आहे.
पण परब हे राणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. परब यांची सावंतवाडीमध्ये मोठी ताकद असून ते आधी निलेश राणे यांचे कट्टर समर्थक होते. ते राणे कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. पण काही कारणाने त्यांच्यात दुरावा आला तो आलाच. यादरम्यान चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले आणि परब यांचे त्यांच्याशी संवाद वाढला.
परब यांची चव्हाण यांच्याबरोबर जवळीक वाढली. थेट संपर्कही वाढला, त्यातूनच त्यांच्यावर प्रदेश युवा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पुढे 2024 च्या विधानसभा निवडणुकी वेळी परब यांनी भाजपच्या तिकीटावर उमेदवारी मागितली. मात्र युती धर्मामुळे ही जागा शिवसेना नेते दीपक केसरकर यांना गेली. यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचे ठरवले. त्या प्रमाणे परब यांनी घोषणा देखील केली.
या घोषणेनंतर परब यांनी थांबावे, आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली होती. त्यावेळी परब आणि फडणवीस यांच्यात झालेल्या फोनवरील चर्चेचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यात परब यांनी नारायण राणेंनी चव्हाण यांना त्रास दिल्याचे म्हटलं होते. त्यानंतर राणेंनी परब यांच्यावर जहरी टिका केली होती.
परब यांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्याने त्यांचे पक्षातून निलंबित झाले. त्यांचा पराभवही झाला. त्यांना 34 हजार मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. पण त्यांना मिळालेली मते विचारात घेता भाजपने आपला निर्णय आता मागे घेतला. थेट मुंबईत बोलावून त्यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. चव्हाण यांनी या मागचे कारण सांगताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे पक्ष संघटन आणखी बळकट होईल, त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते.
पण या सगळ्या घडामोडीमागे परब यांना ताकद देण्यासह जिल्ह्यातील राणेंच्या वर्चस्वाला चाप लावण्याचा प्लॅन भाजपनं आखत असल्याचेच दिसत आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील तोंड सुख घेतलं आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी देखील यावरून फिरकी घेत आणि राणे परब यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का असा सवाल केला होता. त्याचीही राज्यभर चर्चा झाली होती.
प्रश्न 1: रत्नागिरीत कोण आव्हानासमोर आले आहेत?
उत्तर: उदय सामंत यांना आव्हान मिळाले आहे.
प्रश्न 2: सिंधुदुर्गात कोणाचा प्रवेश झाला?
उत्तर: विशाल परब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
प्रश्न 3: भाजपने या प्रवेशातून काय संदेश दिला आहे?
उत्तर: शिंदे यांच्या सेनेविरुद्ध ताकद वाढवणे आणि नारायण राणेंवर दबाव टाकणे.
प्रश्न 4: नारायण राणे यांच्यासाठी याचा काय अर्थ आहे?
उत्तर: भाजप त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याच्या तयारीत असल्याचा संकेत आहे.
प्रश्न 5: या प्रवेशामुळे कोकणातील राजकारणात काय बदल होणार?
उत्तर: शिंदे व राणे यांची अडचण वाढेल आणि भाजपचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.