Devendra Fadanvis-Chandrakant Patil
Devendra Fadanvis-Chandrakant Patil Sarkarnama
विश्लेषण

भाजपाला विधान परिषद राज्यसभेपेक्षा सोपी वाटतेय; ...पण २२ मते आणणार कुठून ?

उमेश घोंगडे

पुणे : राज्यसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांचा विजय खेचून आणल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत राज्यसभेच्या पेक्षाही मोठा विजय होईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. मात्र, पाचव्या उमदेवारासाठी लागणारी २२ मते भाजपा कशी मिळविणार असा प्रश्‍न आहे. गुप्त मतदानामुळे भाजपाला सोपी वाटणारी निवडणूक प्रत्यक्षात राज्यसभेपेक्षा अवघड असल्याचे दिसत आहे.

विधान परिषदेतील विजयाचा आत्मविश्‍वास फडणवीस आणि पाटील यांनी गेल्या आठ दिवसात वारंवार बोलून दाखवला आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्य विधानसभेची पाचवी जागा निवडून आणणे भारतीय जनता पक्षासाठी राज्यसभेपेक्षाही मोठं आव्हान आहे. भारतीय जनता पक्षाचे स्वत:चे १०६ आमदार व त्यांच्यासोबत असलेल्या अपक्षांसह हा आकडा ११३ वर जातो. १०८ मतांमध्ये भाजपाचे चार आमदार सहजपणे निवडून येऊन त्यांच्याकडे पाच मतं शिल्लक राहणार आहेत. पाचवा उमेदवार निवडून येण्यासाठी २७ मतांचा कोटा गृहीत धरला तर यासाठी त्यांना आणखी २२ मतांची गरज पडणार आहे. हा आकडा मोठा आहे. त्यामुळे या मतांची तजवीज भाजपा कशी करणार असा प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे.

राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार फारसे सक्रिय नव्हते. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भाने त्यांनी गुरूवारी केलेले वक्तव्य लक्षात घेतले तर ते सक्रिय झाल्याचे दिसत आहे. अजित पवार खरोखरच सक्रिय झाले असतील तर अपक्ष आमदारांना आपलेसे करणे भाजपाला जड जाईल. कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरी पवार यांचा प्रत्येकाशी चांगला संपर्क आहे. आमदारांची कामे मार्गी लावण्यास पवार यांचे प्राधान्य असते. विरोधी पक्षातील आमदारदेखील अजित पवार यांच्यावर नेहमीच खूष असतात. त्यामुळेच ही निवडणूक भाजपासाठी वाटते तितकी सोपी नसल्याचे राजकीय तज्ञ सांगत आहेत.

या निवडणुकीत आम्ही विजय मिळवू असा विश्वास फडणवीस आणि चंद्रकांत पाटील वारंवार व्यक्त करीत आहेत. याचा अर्थ आधीपासून त्यांची काही योजना असेल. त्याची अंमलबजावणी करण्याचेदेखील काहीएक नियोजन असेल. तरीही बावीस आमदार आपल्या बाजूला वळविणे अवघड गोष्ट असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

विधान परिषदेचे मतदान गुप्त पद्धतीने असल्याने इतर पक्षांचे तसेच अपक्ष आमदार आपल्याला निश्चितपणे भाजपाच्या उमेदवारांना मत देतील, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना आहे. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सारं काही पार पडेल असा, विश्‍वास प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष खरोखरच पाच उमेदवार निवडून आणतात की अजित पवार त्यांना रोखतात हे येत्या २० जूनला स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT