Raj Thackeray, Ashish Shelar Sarkarnama
विश्लेषण

BJP Politics : भाजपचं ठरलं! ठाकरेंचा पाया मुंबईतून उखडण्यासाठी मनसेशी हातमिळवणी

BJP And MNS Yuti : मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची होतेय रंगीत तालीम!

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai Political News :

निवडणुका जिंकण्याचं पक्कं गणित घेऊन देशाच्या राजकारणात उतरलेल्या भाजपनं आता मनसेला गळाला लावण्याचं निश्चित केलं आहे. यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिल्लीला जाऊन भाजप आणि मनसे युतीचे फायदे नीट समजावून सांगिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर स्वतः शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेऊन युतीसाठी रणनीती पक्की केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपला लोकसभेसाठी मनसेची सोबत फारशी गरजेची नसून त्यांचा डोळा आहे तो मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीवर.

मनसेला सोबत घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा मुंबईतून पाया उखडण्याचा भाजप डाव रचत असल्याचं समजतं.

एकदा का मुंबईतून शिवसेनेचं अस्तित्व संपलं की, मग राज्यातून त्यांचा गाशा गुंडाळायला फार काही करावं लागणार नाही, असा भाजपचा (BJP) प्लान आहे.

काही दिवसांपासून मनसे (MNS) महायुतीत सामील होणार, अशी चर्चा रंगली आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्याने मनसे-भाजप युतींच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना दिल्लीतून बोलावणं येण्याची चर्चाही आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बातचीत करून पुढची रणनीती निश्चित करण्यासाठी शेलार प्रयत्नशील असल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात भाजप-मनसे युतीबाबत येत्या काही दिवसांत निर्णय होईल, असे विधान केले होते. फडणवीसांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांना होकार किंवा नकार देणं टाळलं होतं, याचवेळी त्यांनी स्पष्ट बोलणंही टाळलं होतं. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीची चर्चा कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंदाजे 40 हजार कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेचा व्याप हा एका छोट्या राज्यासारखा आहे. मराठी माणसांच्या अस्मितेचं राजकारण करत शिवसेनेनं मुंबईवर राज्य करत मुंबई महापालिकेची तिजोरी स्वतःकडे ठेवली आहे. शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेत असून, याच जिवाच्या जोरावर 'मातोश्री'नं राज्यभरात पंख पसरले आहेत. म्हणूनच भाजपनं आता शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करण्याचं ठरवलं असून, यासाठी त्यांना मनसेची मदत हवीय. मराठी माणसांच्या मतांमध्ये फाटाफूट करत भाजपला मुंबईत क्रमांक एकचा पक्ष करायचा आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत भाजप आणि अखंड शिवसेना यांना प्रत्येकी समान 3-3 जागा मिळाल्या होत्या. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीतसुद्धा भाजपनं शिवसेनेच्या नाकात दम आणला होता. थोडक्यात त्यांची सत्ता हुकली होती. या वेळी लोकसभा असो की मुंबई महापालिका... भाजपला एकहाती मुंबईवर वर्चस्व मिळवायचे असून, यासाठी त्यांना मनसेची मदत हवी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरेंचं भाजप आणि त्यांच्या नेत्यांबाबतचं मवाळ धोरण हे युतीकडे जाण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT